माकड हसले त्याच क्षणाला, माकड मेले; माणूस झाला, Vinda Karandikar information Biography in Marathi विंदा करंदीकर माहिती निबंध मराठी
माकड हसले त्याच क्षणाला,
माकड मेले; माणूस झाला,
परदु:खाने रडला प्राणी
देव प्रकटला त्याच ठिकाणी
विंदा करंदीकरांची ही कणिका खुप काही सांगून जाते. भारतातील ज्ञानपीठ सारखा सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे वि. स. खांडेकर आणि वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यानंतर विंदा मराठी साहित्यातील तिसरे साहित्यिक आहेत. साहित्यातील ज्ञानसूर्य, मराठी साहित्यातील एक तपस्वी, ‘ज्ञानतपस्वी, भारतीय साहित्यातील महामेरू, ‘विश्वाला गवसणी घालणारा साहित्यमहर्षी’ इ. विशेषणे वापरून त्यांचा गौरव केला.आज आपण याच मराठी मातीत जन्मलेल्या एका रत्नाची माहिती थोडक्यात घेणार आहोत.
विंदा करंदीकर यांचे बालपण–
विंदा करंदीकर यांचा जन्म २३ ऑगस्ट १९१८ रोजी धालवल ता. देवगड, जिल्हा रत्नागिरी सध्याचा सिंधुदुर्ग या गावी झाला. त्यांचे मूळ नाव गोविंद विनायक करंदीकर. काव्यलेखनासाठी त्यांनी विंदा करंदीकर हे टोपण नाव धारण केले व नंतर त्याच नावाने ते साहित्य विश्वात ओळखले जाऊ लागले. त्यांचे प्राथमिक शिक्षण कुर्ल्याच्या सरकारी शाळेत, माध्यमिक शिक्षण कोल्हापूरच्या न्यू स्कूलमध्ये, महाविद्यालयीन शिक्षण कोल्हापूरच्याच राजाराम महाविद्यालयात तर बी.ए. आणि एम.ए.ची पदवी त्यांनी मुंबई विद्यापीठातून घेतली. करंदीकरांनी अर्थार्जनासाठी प्राध्यापकीय व्यवसाय स्वीकारत मुख्यतः रूइया महाविद्यालय (माटुंगा) व एस.आय.इ.एस.महाविद्यालय (शीव), मुंबई येथे इंग्रजीचे अध्यापन कार्य केले. पूर्णवेळ साहित्यलेखनासाठी त्यांनी १९७६ साली स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. विंदा करंदीकरांचा सुरूवातीच्या काळात सामाजिक, राजकीय विचारांशी, चळवळींशी संबंध आला होता. प्रारंभी सावकरवादी असलेले विंदा नतंर मार्क्सच्या साम्यवादी विचारांकडे आकृष्ट झाले. गांधीजींच्या विचारांचाही काही प्रमाणात त्यांच्यावर प्रभाव होता.
१९४२ चे चले जाव आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र चळवळ यात त्यांचा सहभाग होता. हैद्राबाद मुक्ती संग्रामातील सक्रिय सहभागाबद्दल त्यांना तुरूंगवासही भोगावा लागला होता.
करंदीकरांच्या निर्मितीचा आवाका अत्यंत मोठा आहे. कवी, लघुनिबंधकार, भाषांतरकार, समीक्षक आणि विचारवंत अशा विविध नात्यांनी त्यांची कामगिरी मौलिक स्वरूपाची आहे. त्यांचे वाङ्मयीन व्यक्तिमत्त्व व्युत्पन्न, बहुश्रुत आणि अनेकविध संस्कारांनी संपन्न आहे. ‘परंपरे’चा स्वीकार करून ‘नवते’च्या दिशा शोधणे, हा करंदीकरांच्या जाणिवेचा स्वभाव आहे. महान साहित्याच्या प्रभावातून वाङ्मयाची अत्यंत व्यापक जाणीव त्यांच्यात निर्माण झाली. शेक्सपिअर, टॉलस्टॉय, दोस्तोव्हस्की, जेम्स जॉइस, हॉपकिन्स, ब्राऊनिंग, टी. एस्. एलियट या पाश्चात्त्य साहित्यिकांना त्यांनी मौलिक मानले. केशवसुत, माधव ज्युलियन आणि बा. सी. मर्ढेकर हे त्यांच्यावर परिणाम करणारे महत्त्वाचे मराठी कवी. ‘महाभारत’ हा त्यांना वाङ्मयीन श्रेष्ठतेचा मानदंड वाटतो. ते म्हणतात, ‘महाभारताच्या तुलनेत पाश्चात्त्य महाकाव्यं ही केवळ चांगली दीर्घकाव्यं ठरतात. प्रत्येकाला स्वतंत्र वैशिष्टय़ं आहेत, पण महाभारताची परिमाणं कोणालाच नाहीत. महाभारत आपल्या वयाच्या सातव्या वर्षांपासून सत्तराव्या वर्षांपर्यंत कधीही वाचा, त्यातलं काही ना काही कायमचं देऊन जातं.
करंदीकरांची रसिकांच्या मनातील मुख्य प्रतिमा ‘कवी विंदा’ अशी आहे. त्यांच्या ‘स्वेदगंगा’ , ‘मृद्गंध’, ‘धृपद’, ‘जातक’, ‘विरूपिका’ आणि ‘अष्टदर्शने’ या सहा कवितासंग्रहांत मिळून साडेचारशेच्या आसपास कविता समाविष्ट आहेत. करंदीकरांच्या प्रारंभीच्या अनेक कवितांवर मार्क्सवादाचा निश्चित स्वरूपाचा संस्कार झालेला आहे. ‘स्वेदगंगा’, ‘मुंबई’, ‘लोकशक्ति ही’, ‘विश्वरूप’, ‘मजूर’ इत्यादी कवितांमध्ये वक्तृत्वपूर्णता आहे. ‘माझ्या मना, बन दगड’, ‘ती जनता अमर आहे!’, ‘दातापासून दाताकडे’ या करंदीकरांच्या प्रसिद्ध आणि परिणामकारक कविता आहेत. नंतरच्या काळात विचारप्रणालींच्या मर्यादा जाणवल्यावर (‘दंतकथा’ सारखी कविता) समाजातील सामान्य माणसाविषयीची, उपेक्षितांविषयीची त्यांची आस्था आणि त्यांच्या चांगुलपणाविषयीचा त्यांचा विश्वास कधीही क्षीण झालेला दिसत नाही. तसेच प्रस्थापित व्यवस्थेचे समर्थन वा पूर्वपरंपरेचा गौरवही त्यांनी केलेला नाही. सामाजिक अन्याय, शोषण, सामाजिक विषमता आणि विसंगती इत्यादींना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे विरोध करणाऱ्या पुरोगामी जाणिवांचा आविष्कार करंदीकरांच्या कवितेत अखेपर्यंत पाहावयास मिळतो. हे त्यांच्या सामाजिक जाणिवेचे वैशिष्टय़ आहे.
करंदीकरांच्या बालकवितांचे अकरा संग्रह आहेत. पारंपरिक बालगीतांपेक्षा ही कविता वेगळी, अनोखी आहे. त्यात आघातयुक्त छंदांचा वापर असून, नाद आणि अर्थ यांची गंमतशीर गुंफण केली आहे. बालकांच्या भावविश्वाशी समरसता, नावीन्यपूर्ण कल्पनाशक्ती यांच्यासोबतच अभिजात आणि प्रसन्न विनोद, मिस्कीलपणा या बालकवितांत आढळतो. टोक न मोडण्याचा, पडसे न येण्याचा, सुटी न मिळण्याचा, पतंग गुल करण्याचा असे विविध मंत्र मुलांना आकर्षित करणारे आहेत. ‘स्पर्शाची पालवी’ आणि ‘आकाशाचा अर्थ’ हे करंदीकरांचे लघुनिबंधसंग्रहही एकसाची नाहीत. नवकविता आणि नवकथा यांच्याशी नाते सांगणारे हे ‘नवलघुनिबंध’ आहेत. व्रतकथांचा घाट, स्वैर आठवणी, ठाशीव युक्तिवाद आणि काव्यात्म लय असे शैलीचे विविध नमुने त्यात आहेत. सामान्याशी सहभाव हे करंदीकरांचे वैशिष्टय़ इथेही आहे. ‘आकाशाचा अर्थ’, ‘आम्रयोग’, ‘स्पर्शाची पालवी’, ‘सुखी होण्याचा हक्क’, ‘पुरुष आणि पिशव्या’ असे विविधतापूर्ण, चैतन्यदायी लघुनिबंध करंदीकरांनी लिहिले आहेत.
कवी म्हणून मिळत गेलेल्या प्रसिद्धीमुळे करंदीकराचे लघुनिबंध काही प्रमाणात दुर्लक्षित राहिले. त्यांचे ‘स्पर्शाची पालवी’ (१९५८), ‘आकाशाचा अर्थ’ (१९६५) आणि ‘करंदीकरांचे समग्र लघुनिबंध’ हे तीन संग्रह प्रकाशित झालेले आहेत. करंदीकरांच्या लघुनिबंधांमध्येही काव्य आहे. म्हणजे गद्यशैली आणि काव्यशैली यांचे मिश्रण झालेले आहे. संवेदनक्षमता, भावनात्मकता, हळुवारपणा, कोटिबाजपणा, आलंकारिकता ही त्यांच्या लघुनिबंधाची काही वैशिष्टये सांगता येईल. स्वतःचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, ते कसे असावे, कसे जगावे या संबंधीचे विचार ललित्यपूर्ण शैलीतून लहान, लहान घटना प्रसंगातून, व्यक्तिचित्रातून त्यांनी लघुनिबंधातून मांडले आहेत. मात्र १९६५ सालीच कुठलीही पूर्वसूचना न देता त्यांनी आपले लघुनिबंधलेखन थांबविले.
देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे,
घेता घेता एक दिवस देणाऱ्यांचे हात घ्यावे’
असा संदेश देणारे विंदा आयुष्यभर सगळ्यांना देत राहिले. भरभरून देत राहिले. त्यांना वेळोवेळी पुरस्कारातून मिळत गेलेली रक्कम त्यांनी सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रात निःस्वार्थी, निःस्पृहपणे काम करणाऱ्या संस्थांना दान केली. मृत्यूनंतरही देहदान व नेत्रदान करून त्यांनी ‘बोले तैसा चाले’ ही लाकोक्ती सार्थ ठरविली.
या सार्या अफाट कामाबद्दल ‘कबीर सन्मान’, ‘जनस्थान पुरस्कार’, साहित्य अकादमीचा पुरस्कार, साहित्यातील सर्वोच्च असा ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार आणि अजून अनेक पुरस्कार विंदांना मिळाले. पण पुरस्कारापोटी मिळालेली रक्कम विंदांनी अनेक सामाजिक संस्थांना वाटून दिली. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात विंदा भागानगरच्या सत्याग्रहात सहभागी झाले तेव्हा हैदराबादच्या तुरुंगात गेले. स्वातंत्र्य मिळाल्यावर तुरुंगवास भोगाव्या लागणार्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना सरकारने निवृत्तीवेतन देऊ केले होते, परंतु स्वातंत्र्याच्या कामात थोडे कष्ट झाले आणि थोडा वेळ खर्ची पडला तर लगेचच त्याचा मोबदला घेण्याची काय गरज? शिवाय शिक्षण पूर्ण होऊन नोकरीही लागली असल्याने विंदांनी ते निवृत्तीवेतन नाकारले. आजच्या संधीसाधू आणि भ्रष्टाचाराच्या कोलाहलात विंदांचे हे मोठेपण नक्कीच आदरणीय आहे.
साहित्याच्या रूपाने सर्व मानवजातीसाठी आपल्या मराठी भाषिकांना अभिमान वाटावा असा अनमोल ठेवा मागे ठेवून ते आपल्यातून निघून गेलेले आहेत. वयाच्या ९१ व्या वर्षी दि.१४ मार्च २०१० रोजी वृद्धापकाळाने विंदांचे निधन झाले .
मित्रांनो, Vinda Karandikar information Biography in Marathi Vinda Karandikar Essay in Marathi ही माहिती कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये आवश्य कळवा. कॉलेज कट्टा म्हणजे माहिती आणि मनोरंजनाचे व्यासपीठ!
Vinda Karandikar Essay in Marathi
Vinda Karandikar information Biography in Marathi
Leave a Reply