कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित ‘शेरशाह’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. अवघ्या २४ व्या वर्षी देशासाठी हसत हसत शहिद होणारे कॅप्टन विक्रम बत्रा देशभक्तिचा उच्यतम आदर्श आहेत.
Captain Vikram Batra information biography in Marathi कॅप्टन विक्रम बत्रा माहिती मराठी
“में आऊँगा,या तो तिरंगा लहराकर आऊँगा या तिरंगे में लिपटकर आऊँगा लेकिन आऊँगा जरूर”. असे आपल्या मित्रांना बोलणारे कॅप्टन विक्रम बत्रा.’ये दिल माँगे मोर’ बोलत संपूर्ण भारताचे मन जिंकणारे कॅप्टन विक्रम बत्रा. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे कॅप्टन विक्रम बत्रा हे नाव सर्वांना माहिती झाले आहे आपण सुरक्षित राहावे म्हणून आपल्या प्राणांची आहुति देणाऱ्या भारतमातेच्या या वीर सुपुत्राबद्दल सर्वांना माहिती असणे आवश्यक आहे म्हणून त्यांच्यावर आज लिहित आहे.
कॅप्टन विक्रम बत्रा यांचा जन्म ९ सप्टेंबर १९७४ रोजी हिमाचल प्रदेशच्या पालमपूर येथे झाला. गिरधारी लाल बत्रा हे त्यांचे वडिल आणि कमल बत्रा या त्यांच्या आई आहेत.
विक्रम बत्रा याचे वडील गिरधारी लाल बत्रा हे सरकारी शाळेचे मुख्याध्यापक होते, तर आई शाळेची शिक्षिका होती. पालकच शिक्षक असल्याचा परिणाम विक्रम बत्रा यांच्या जीवनावर दिसून आला. विक्रम बत्रा हे सुरुवातीपासूनच शिस्तबद्ध विद्यार्थी होते. दूरदर्शन वाहिनीवरून १९८५ साली प्रसारित होणाऱ्या ‘परमवीर चक्र’ या मालिकेमुळे विक्रम यांच्या मनात भारतीय सैन्यामध्ये जायची तीव्र इच्छा निर्माण झाली. हाँगकाँगमधील एका शिपिंग कंपनीत मर्चन्ट नेव्हीमध्ये विक्रम यांची निवड झाली होती, पण त्यांनी सैन्यात जायचा मार्ग स्वीकारला. चेन्नईला मर्चन्ट नेव्हीच्या ट्रेनिंगसाठी जाणार होते. त्यांच्या ट्रेनचं तिकीटही काढून झालं होतं. पण तिकडे जायच्या तीन दिवस आधी त्यांनी विचार बदलला. असं का करतोय, असं त्यांच्या आईने विचारलं. तेव्हा ते म्हणाले, की आयुष्यात फक्त पैसाच सर्वस्व नसतो. मला काहीतरी मोठं करायचंय, सर्वांना आश्चर्य वाटेल असं, माझ्या देशाचं नाव मोठं होईल असं काहीतरी करायचंय. १९९५ साली ते आयएमएची परीक्षा पास झाले.
विक्रम बत्रा हे महाविद्यालयीन काळात एनसीसी, एअर विंगमध्ये सहभागी झाले झाले. कॅप्टन विक्रम बत्रा यांची एनसीसी एअर विंग युनिटसह पिंजोर एअरफील्ड आणि फ्लाइंग क्लब येथे ४० दिवसांच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली होती. कॅप्टन विक्रम बत्रांनी एनसीसीचं ‘सी’ प्रमाणपत्र देखील मिळवलं होतं. एनससीसीमध्येच त्यांना कॅप्टन पद मिळालं होतं.
विक्रम बत्रा यांची १९९६ मध्ये भारतीय सैन्य अकादमीत (आयएमए) निवड झाली आणि त्यानंतर त्यांनी महाविद्यालय सोडत ते डेहराडूनला गेले. ६ डिसेंबर १९९७ रोजी त्यांनी १९ महिन्यांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर आयएमएमधून पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांना जम्मू आणि काश्मीर रायफल्सच्या १३ व्या बटालियनमध्ये लेफ्टनंट म्हणून नियुक्त करण्यात आले. जानेवारी १९९९ मध्ये त्यांना कर्नाटकच्या बेळगाव येथे दोन महिन्यांचा कमांडो कोर्स पूर्ण करण्यासाठी पाठवण्यात आले. कमांडो कोर्स पूर्ण झाल्यावर त्यांना सर्वोच्च श्रेणीतीलं इन्स्ट्रक्टरचा ग्रेड देण्यात आली.
१९९९ साली जेव्हा कारगिल युद्धाच्या वेळी पाकिस्तानने भारताच्या भूमीवर कब्जा केला होता, तेव्हा त्यावेळी लेफ्टनंट असलेल्या विक्रम बत्रा ह्यांना १९ जून १९९९ रोजी (कारगिल युद्ध सुरु झाल्यानंतर ५ आठवड्यांनी ) शिखर ५१४० वर परत ताबा मिळवण्याची ऑर्डर मिळाली होती. शिखर ५१४० च्या शिखरावर पाकिस्तानी सैन्याचा कॅम्प होता ज्यात अनेक सैनिक त्या शिखराच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानने ठेवले होते. विक्रम बत्रा यांच्या ’13 जॅक अलाय’ या युनिटला 5140 शिखरावरील पाकिस्तानी तळावर हल्ला करून ते शिखर पुन्हा भारताच्या ताब्यात घेण्याची जबाबदारी देण्यात आली. कर्नल योगेश जोशी यांच्याकडे दोन तरुण अधिकारी होते. एक होते जामवाल, आणि दुसरे होते कॅप्टन विक्रम बत्रा. त्यांनी दोघांनाही बोलावलं आणि एका मोठ्या खडका आडून बोटाने शिखर दाखवलं. त्या शिखरावर चढाई करायची असल्याचंही सांगितलं. रात्रीच मोहीम सुरू होईल आणि सकाळपर्यंत तुम्हाला वर पोचावं लागेल, असं कर्नलनी दोघांना सांगितलं. मोहीम फत्ते झाल्यावर तुमचा कोड काय असेल, असं त्यांनी दोघा अधिकाऱ्यांना विचारलं. दोघं वेगवेगळ्या बाजूंनी चढाई करणार होते. लेफ्टनंट जामवाल म्हणाले, ‘सर मी, ओ ये ये ये, असा कोड देईन.’ विक्रम म्हणाले, ‘मी, ये दिल माँगे मोअर, असं म्हणेन’.विक्रम बत्रा ह्यांना त्यांच्या साथीदारांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा अगदी उत्साहाने आणि भरभरून साथ दिली. त्यांचे शिखर काबीज करण्याचे मिशन हे भारतीय इतिहासातील सर्वात कठीण मिशन समजले जाते.
या लढाईत विक्रम यांचं कोड-नेम ‘शेरशाह’ होतं.पाकिस्तानी सैनिक त्यांना म्हणत होते, ‘शेरशाह, तू परत जा, नाहीतर तुझं प्रेत परत जाईल.’ यावर विक्रम म्हणाले ‘एक तासभर थांब. मग कोणाची प्रेतं परत जातात ते कळेल,’.शिखर ५१४०, टायगर हिल काबीज केल्यानंतर भारताची काश्मीर खोऱ्यात पकड मजबूत झाली. हे ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर बत्रांनी त्यांच्या वडिलांना फोन करून कळवले होते की त्यांनी त्यांची जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. तेव्हा त्यांना माहित नव्हते की त्यांच्यावर ह्या पेक्षाही मोठी व कठीण जबाबदारी देण्यात येणार आहे. शिखर ५१४० काबीज केल्याच्या बरोबर ९ दिवसांनंतर बत्रांनी अजून एक फोन करून सांगितले की ते एका तातडीच्या मिशनवर जात आहेत. त्यांच्यावर शिखर ४८७५ परत काबीज करण्याची महत्वाची जबाबदारी सोपवलेली होती. हे शिखर काबीज करणे अत्यंत कठीण होते कारण ह्या शिखरावर म्हणजेच १६००० फुटांवर पाकिस्तानी सैन्य दबा धरून बसले होते आणि हे शिखर चढाई करण्यास अत्यंत कठीण होते. त्यात भर म्हणजे धुके आपल्या सैनिकांची चढाई आणखी कठीण करीत होते. ह्या मिशनवर गेल्यानंतर ते परत घरच्यांशी संपर्क साधू शकले नाहीत.
शिखरावर दबा धरून बसलेल्या शत्रू सैन्याला विक्रम बत्रा आणि त्यांच्या साथीदाऱ्यांच्या आगमनाची कुणकुण लागली आणि त्यांनी जोरदार हल्ला केला. ह्या हल्ल्यात बत्रा गंभीर जखमी झाले. त्यांचे सहकारी अनुज नय्यर ह्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत शत्रूशी लढा दिला. ती ७ जुलै १९९९ ची रात्र होती. ८ जुलै १९९९ च्या सकाळी भारताने शिखर ४८७५ काबीज केले परंतु विक्रम बत्रा ह्यांना मात्र गमावले.
कॅप्टन विक्रम बत्रा यांची प्रेयसी डिंपल चमा चंदीगढमध्ये राहत असे. आता डिंपल पंजाब सरकारच्या एका शाळेत सहावी ते दहावीच्या मुलांना त्या समाजशास्त्र व इंग्रजी हे विषय शिकवतात. एकदा नादा साहेब गुरुद्वाऱ्यात प्रदक्षिणा घालून झाल्यावर विक्रम त्यांना म्हणाले होते, ‘शुभेच्छा, मिसेस् बत्रा. आपण चार फेरे घेतलेले आहेत, म्हणजे शीख धर्मानुसार आपण आता नवरा-बायको झालो आहोत.’डिंपल आणि विक्रम एकाच कॉलेजात शिकत होते. विक्रम कारगिलहून सहीसलामत परतले असते, तर त्या दोघांचं लग्न झालं असतं.विक्रम युद्धभूमीवर मरण पावल्यानंतर त्यांच्या एका मित्राने डिंपल यांना फोन केला आणि विक्रम गंभीर जखमी झाल्याचं त्यांना सांगितलं. त्यांनी विक्रमच्या आईवडिलांना फोन करावा, असंही त्या मित्राने सुचवलं. डिंपल पालमपूरला पोचल्या तेव्हा त्यांना शवपेटीत ठेवलेलं विक्रम यांचं पार्थिव दिसलं. तिथे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने होते, म्हणून त्या जाणीवपूर्वक पार्थिवाजवळ गेल्या नाहीत. मग त्या चंदीगढला परतल्या आणि इतर कोणाशी विवाह न करता आयुष्यभर विक्रमच्या आठवणी जपत राहायचं, असं त्यांनी ठरवलं. कारगिलला जाण्यापूर्वी विक्रम डिंपल यांना बरोब्बर साडेसात वाजता फोन करायचे, देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात असले तरी त्यांचा हा नेम चुकला नाही.
भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार असणारं परमवीर चक्र कॅप्टन विक्रम बत्रा यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आलं. २६ जानेवारी २००० रोजी विक्रम यांचे वडील गिरधारीलाल बत्रा यांनी हजारो लोकांच्या उपस्थितीत तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारला.
अशा ह्या थोर, पराक्रमी योद्ध्यास आमचे शतशः वंदन !
अक्षय जाधव.
कॉलेज कट्टा.
मित्रांनो, कॅप्टन विक्रम बत्रा यांच्याबद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा. कॉलेज कट्टा म्हणजे माहिती आणि मनोरंजनाचे व्यासपीठ!
Captain Vikram Batra information biography in Marathi
कॅप्टन विक्रम बत्रा माहिती मराठी
Leave a Reply