मुलगी झाली म्हणून चिंधी म्हणण्यापासून ते अनाथांची माय होण्यापर्यंतचा सिंधूताई यांचा खडतर प्रवासजाणून घेऊयात… Sindhutai Sapkal information Biography in Marathi
“लकीर की फकीर हुं मै, उसका कोई गम नही,
नही धन तो क्या हुआ, इज्जत तो मेरी कम नही!”
काल पहाटे पहाटे सिंधुताई गेल्या ही बातमी कानावर पडली आणि हॄदयाचा ठोकाच चुकला. अनाथांची माय असणाऱ्या सिंधुताई परत आज सर्वांना अनाथ करून निघुन गेल्या.संपूर्ण महाराष्ट्राची माय असणाऱ्या याच सिंधुताईं विषयी आज आपण माहिती घेणार आहोत.
Sindhutai Sapkal life Story in Marathi

देवा आम्हाला हसायला शिकव परंतु आम्ही कधी रडलो होतो याचा विसर आम्हाला पडू देऊ नको” अस देवाकडे मागणी करणाऱ्या सिंधुताई.
“जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे”. या ओळींप्रमाणे सिंधूताईंच्या आयुष्याची वाटचाल आपल्या दृष्टीस पडते. मुलीचा जन्म झाला ती नकोशी होती म्हणून ‘चिंधि’ अस नाव ठेवले तिथपासुन “माई” होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास हा काही मखमली फुलांच्या पाकळ्यांवरुन चालण्या इतका सहज आणि सोप्पा अजिबातच नव्हता.
सिंधुताईंचा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेघे गावात झाला. नाव ठेवलं गेलं ‘चिंधी’ (कापडाचा फाटलेला तुकडा) . चाणाक्ष आणि तल्लख बुद्धीच्या चिंधीला शिक्षणाची भारी आवड! वडिलांच्या प्रेमामुळे जेमतेम ४ थी पर्यंत तिला शिक्षण घेता आलं. गुरे चरायला गेल्यावर लहानशी चिंधी संधी साधत शाळेत जाऊन बसे. तिच्या वडीलांना तिला शिकविण्याची इच्छा होती, परंतु आईचा दुसवास आणि अवहेलना झेलत लहानशी चिंधी कुठपर्यंत मजल मारणार?जेमतेम 11 वर्षांची असेल तेव्हा चक्क 30 वर्षाच्या श्रीहरी सपकाळ नावाच्या इसमाशी तिचा विवाह लावून देण्यात आला. त्यानंतर काही दिवसातच एकभूत आधार असलेलं वडिलांचं छत्र देखील काळाने हिरावून घेतलं. लहानपणीच लग्न झाल्यावर खेळण्या बागडण्याच्या वयात ती कोवळी पोर तीन लेकरांची आई झाली होती. गावातील इतर स्त्रियांप्रमाणेच चिंधीचं जगणं देखील शोषण आणि अपमानाने भरलेलं होतं पण तिच्यात एक वेगळेपण होतं, ते म्हणजे तिच्यातील आत्मविश्वास आणि चार चौघात आपलं म्हणणं ठामपणे मांडण्याची निर्भीडता तिच्यात ठासून भरलेली होती.
Sindhutai Sapkal Essay speech in Marathi अनाथांची माय सिंधुताई सपकाळ निबंध भाषण मराठी
गावातील जनावरांचे शेण उचलण्याचा मोबदला मिळविण्याकरता ताईंनी पहिलं बंड पुकारलं. गावातल्या स्त्रियांना न्याय मिळवून दिला. ताईंचा विजय झाला पण गावातल्या जमीनदाराचा अहंकार दुखावला. झालेल्या अपमानाचा त्याला सूड घ्यायचा होता, त्यावेळी चिंधी नऊ महिन्यांची गर्भवती होती, सावकाराने तिच्या पोटातील मूल त्याचे असल्याचे सांगत तिच्या नवऱ्याचे कान भरले. चिंधीचा नवरा देखील सावकाराच्या सांगण्यात आला आणि चिंधीला बेदम मारहाण करून गोठ्यात फेकून दिले. अर्धमेल्या अवस्थेत चिंधीने गोठ्यातच एका मुलीला जन्म दिला, एकाकी पडलेल्या चिंधीला काहीही सुचत नव्हते. बाळाची नाळ कापण्यासाठी जवळ पडलेला दगड उचलून त्यावर वर केले आणि नाळ कापली.
“मला आज देखील आठवतंय, मी त्या नाळेवर दगडाचे सोळा वार केले तेंव्हा ती नाळ कापल्या गेली होती.”अस सिंधुताई बोलताना सांगत होत्या. किती ह्या वेदना किती हे दुःख.
त्यानंतर तिने त्या मुलीला नदीच्या थंड पाण्याने स्वच्छ केलं आणि तिला घेऊन आपल्या विधवा आईचं घर गाठलं. समाजाच्या धाकाने आईने चिंधीला घरातून बाहेर काढलं. निराधार झालेली चिंधी दहा दिवसांच्या चिमुकलीला घेऊन जीव देण्यासाठी निघाली, वाटेत तिला पाण्याकरता तळमळत असलेला भिकारी दिसला. त्याला चिंधीने पाणी पाजलं जवळचा भाकर तुकडा दिला. त्या भिकाऱ्याला थोडी तरतरी आली. या प्रसंगानं तीचं मन बदललं… हे दुसरं जीवन अनाथांना आश्रय देण्याकरता मिळालंय असं तिला वाटून गेलं. पुढे मुलीला घेऊन ती बस मध्ये चढायला गेली असता कंडक्टरने तिकीटा करता पैसे नसल्याने तिला चढू दिले नाही. खूप गयावया केल्यानंतर देखील त्याने तिला हाकलून लावले. बस थोडी पुढे जात नाही तोच त्या बस वर आभाळातून कडकडत वीज कोसळली.
चिंधी करता हा पुनर्जन्म होता. तिच्याकरता आता चिंधीचे काही अस्तित्व उरले नव्हते. ती आता “सिंधू” झाली होती…ती नदी जिच्याविषयी ती लहानपणा पासून ऐकत आली होती.
अनाथांचे जीणे जगता-जगता सिंधुताई अनाथांची माय झाली, आपल्यासारख्या निराधार अनाथांना गोळा करत माईंनी भिक मागून त्यांची पोटं भरली. परभणी-नांदेड-मनमाड या रेल्वेस्थानकांवर माई दिवसभर भिक मागायच्या आणि रात्री झोपायला स्मशानात जायच्या. सिंधुताई सांगताना सांगतात कि ज्यावेळी त्यांना भिक मिळायची नाही त्यावेळी त्या स्मशानातील जळणाऱ्या चितेवर भाकरी भाजून खायच्या. अश्या प्रकारे स्मशानातील जळणाऱ्या चितेच्या उष्णतेत त्यांनी स्वतःच जीवन सावरलं. रात्री-अपरात्री देखील माई रेल्वे स्थानकांवर एकट्या जाऊन अनाथ मुलांना पदराखाली घेत मायेची सावली द्यायच्या. एक एक रस्त्यावरचं मुल ताई आपलसं करत गेल्या आणि आज असंख्य मुलांच्या सिंधुताई आई झाल्या आहेत.
सिंधुताई या दरम्यान आदिवासींच्या हक्कासाठी देखील लढल्या. एक वेळेला तर आदिवासींच्या मागण्यांसाठी त्या प्रधानमंत्री इंदिरा गांधीपर्यंत देखील पोहोचल्या होत्या. हळूहळू लोक सिंधूताईंना “माई” म्हणून ओळखू लागले आणि स्वतःहून पुढे येऊन त्यांनी स्वीकारलेल्या अनाथ मुलांना दान देऊ लागले. वयाच्या 80 व्या वर्षी त्यांच्या पतीने त्यांच्याजवळ येऊन राहण्याचा आग्रह धरला असता ताईंनी आपल्या मुलाच्या रुपात त्यांना स्वीकारलं. आणि म्हणाल्या “आता माझ्यात केवळ आईपण उरलंय बाईपण नाही”.सिंधूताईंचे वक्तृत्व उत्तम असल्याने हळूहळू त्यांची भजनं आणि भाषणं फार प्रसिद्ध होऊ लागली. त्यांच्या भाषणाच्या प्रसिद्धीमुळे त्यांना 2009 साली अमेरिकेतून देखील बोलावणे आले होते.
त्यांना खुप पुरस्कारांनी नावाजले गेले. भारत सरकारने ‘पद्मश्री’ दिला. पण त्यांना आपल्या लेकरानी “माय” म्हणून दिलेला पुरस्कार हा त्यांच्यासाठी सर्वात आधी होता.
त्यांची कन्या ममता या आपल्या आईप्रमाणेच ‘ममता बाल सदन’ नावाचे अनाथ आश्रम चालवत आहेत. आपल्या मुलीचा जन्म गाईच्या गोठ्यात झाला आणि गाईनीच तिचं रक्षण केलंय या भावनेने सिंधूताईंनी वर्धा जिल्ह्यातील नवरगावी ‘गोपिका गाय रक्षण केंद्र’ सुरु केलं. या गोरक्षण संस्थेत आज जवळ-जवळ 200 गायींना संरक्षण मिळालंय.पुण्यातील हडपसर भागात असलेली ताईंच्या ‘सन्मती बाल निकेतन संस्थेत’ अनेक अनाथ मुलांना आश्रय मिळाला आहे. त्यांची काळजी घेण्याकरता ताईच्या 20 मुलांना नियुक्त करण्यात आलं आहे.चीखलदरा इथे मुलींसाठी ‘सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह‘ निर्माण करण्यात आले आहे शिवाय वर्धा येथे आपल्या वडिलांच्या नावाने ‘अभिराम बाल भवन‘ ची स्थापना केलीये.
याच आपल्या माई ने ४ जानेवारी २०२१ रोजी आपल्या सर्वांचा निरोप घेऊन नवीन वर्षातील एक मोठे दुःख आपल्या वाट्याला दिले आणि आपल्याला पोरके केले. जोपर्यंत चंद्र सूर्य राहतील तोपर्यंत माईंचे नाव आणि कार्य लोकांच्या स्मरणात राहिल याबाबतित काहीच शंका नाही. देवाला सुद्धा आईची गरज वाटली म्हणून त्याने आपल्या माई ला बोलावून घेतले असच वाटतय
माईनां आदरांजली…
अक्षय जाधव. कॉलेज कट्टा
मित्रांनो, सिंधीताई सपकाळ यांच्याबद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये आवश्य कळवा. कॉलेज कट्टा म्हणजे माहिती आणि मनोरंजनाचे व्यासपीठ!
Sindhutai Sapkal information Biography in Marathi
Leave a Reply