आदर्श, जनतेचा नेता असे यशवंतराव चव्हाण यांचाबद्दल महत्वपूर्ण माहिती Yashwantrao Chavan Information Biography Essay in Marathi Language
Yashwantrao Chavan Information Biography Essay in Marathi Language
यशवंतराव चव्हाण माहिती निबंध भाषण मराठी
जेव्हा जेव्हा हिमालय अडचणीत आलाय तेव्हा तेव्हा सह्याद्री त्याच्या मदतीला धावलाय. असाच सह्याद्रीच्या मातीतला एक राजकारणी! राजकारण कमी पण समाजकारण जास्त. शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचे खरे पाईक. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ज्यांना संबोधले जाते. दिल्लीच्या राजकारणात ज्यांनी महाराष्ट्राचा ठसा आपल्या कर्तृत्वाने उमटवला. भारताला न लाभलेला एक हुशार पंतप्रधान. महाराष्ट्राची दिल्लीत असणारी ओळख म्हणजेच “यशवंतराव चव्हाण”. पुरोगामी, सुसंस्कृत, निष्कलंक नेतृत्व म्हणजेच यशवंतराव चव्हाण. पदाकडे पाठ आणि लोकांकडे तोंड ठेवणारा सर्वसामान्यांचा नेता अशी ओळख. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजेच यशवंतराव चव्हाण.
Yashwantrao Chavan Information Biography Essay in Marathi Language
यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी जुन्या सातारा जिल्ह्यातील “देवराष्ट्र” या गावी झाला. त्यांच्या लहानपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांनतर त्यांची आई त्यांना घेऊन कराडच्या शुक्रवार पेठेत चारही मुलांना घेऊन राहायला गेल्या. त्यांचे संगोपन त्यांच्या काकांनी आणि आईने केले. थोरली 3 मुले आणि धाकटा यशवंत यांचा सांभाळ मोठ्या कष्टाने त्यांच्या आईने केला. लहानपणापासून त्यांच्या आईने त्यांच्यावर स्वावलंबत्वाचे आणि देशभक्तीचे संस्कार दिले. लहानपणापासूनच ते स्वातंत्रलढ्यात सामील होते.
1930 मध्ये त्यांनी गांधीजींच्या असहकार आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला. त्यातच त्यांचा संबंध स्वामी रामानंद भारती, गोविंद कृपाराम वाणी यांसारख्या लोकांसोबत आला. 1931 मध्ये त्यांनी साताऱ्या मध्ये भारतीय ध्वज फडकवल्यामुळे त्यांना 18 महिन्याचा तुरुंगवास देखील झाला होता.
त्यावेळी त्यांचे वय होते फक्त 19 वर्ष. शिक्षा भोगत असताना त्यांच्या लक्षात आले की जवळजवळ 30-30% लोक जे मागासवर्गीय आहेत जे अस्पृश्य मानले जातात ते स्वातंत्र्यात सहभागी झाले नाहीत. त्यांनी त्यासाठी त्यांच्यात शिक्षणाचा प्रसार करण्याचे ठरवले.
त्यांनी 6-7 मित्रांसोबत मिळून रात्रशाला सुरू केली. उदघाटन करण्यासाठी ते विठ्ठल रामजी शिंदे यांना बोलवायला पुण्याला गेले. विठ्ठल रामजी शिंदे यांनाही त्यांचा उपक्रम आवडला त्यांनी ही कराडला जाऊन शाळेचे उदघाटन केले.
1938 मध्ये मुंबई विद्यापीठातून त्यांनी इतिहास आणि political science मध्ये B.A ची पदवी घेतली. स्वातंत्र्य संग्रामात असताना त्यांचा संबंध कॉंग्रेसच्या सरदार पटेल आणि जवाहरलाल नेहरू यांसारख्या नेत्यांशी आला. त्यातूनच ते 1940 मध्ये साताऱ्याचे काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 1941 साली त्यांनी वकिलीचे शिक्षण पूर्ण केले.
1942 साली त्यांनी फलटण मध्ये वेणूताईंशी विवाह केला. पुढे वेणूताईनी साहेबांच्या प्रत्येक कार्यात साहेबांची सावली प्रमाणे साथ दिली. साहेबांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढउतार आले अनेक दुःखाचा सामना करावा लागला त्यात वेणूताई खंबीरपणे त्यांच्या पाठीमागे उभ्या राहिल्या.
1942 साली भारत छोडो आंदोलनात यशवंतरावांना अटकही झाली पुढे 1944 साली त्यांना सोडण्यात आले.
1946 साली ते दक्षिण सातारा विभागातून पहिल्यांदा मुंबई राज्याच्या विधानसभेवर गेले. त्याच वर्षी त्यांची नियुक्ती मुंबई राज्यांच्या गृह खात्याच्या संसदीय सचिव म्हणून झाली.
त्यानंतरच्या मोरारजी देसाईंच्या सरकारमध्ये ते नागरी पुरवठा आणि वन विभागाचे मंत्री झाले. 1957 साली यशवंतराव कराड मधून विधानसभेत निवडून गेले. ह्यावेळेस ते काँग्रेस चे विधानसभेचे नेते झाले आणि ते मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले. त्यातच महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली होती. मुंबईसह महाराष्ट्र राज्य व्हावे ही मागणी जोर घेत होती. मोरारजींच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सरकारच्या काळात तर कित्येक लोकांचे प्राण गेले होते. याचाच परिणाम मराठी भाषिकांच्या प्रदेशात काँग्रेसचा पराभव झाला पण यशवंतराव स्वतःच्या कामामुळे निवडून आले.
अखेर 1 मे 1960 रोजी मुंबई सह महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली आणि महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीचा कलश घेऊन यशवंतराव चव्हाण आले. यशवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राच्या पहिले मुख्यमंत्री झाले. त्यांच्या काळातच महाराष्ट्र राज्याची प्रगती चालू झाली कृषी आणि औद्योकीक क्षेत्रातील त्यांची धोरणे यांमुळे नेहरू अवाक होत असत. त्यांच्या धोरणांमुळेच महाराष्ट्र देशातील प्रगत 1 औद्योगिक आणि कृषी क्षेत्रात संपन्न असे राज्य बनत चालले होते.
यशवंतरावांनी सर्व समावेशक राजकारण करण्यावर भर दिला. जो मागासवर्गीय समाज कायम समाजातील मुख्य प्रवाहा पासून दूर होता त्यांना त्यांनी मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं. शाहू, फुले आणि आंबेडकर यांची विचारसरणी महाराष्ट्रात यशवंतरावांनीच सुरू केली. भारत चीन युद्धात झालेल्या पराभवानंतर त्यावेळेचे संरक्षण मंत्री कृष्णा मेनन यांनी राजीनामा दिला. 1962 साली यशवंतरावांना संरक्षण मंत्रिपद मिळाले. याचा उल्लेख करताना बोलले जाते की “हिमालयाच्या मदतीला धावला सह्याद्री”.
अश्यातर्हेनें यशवंतरावांची दिल्लीतील कारकीर्द चालू झाली. त्यांनी युद्धानंतर दुबळी झालेल्या भारतीय सैन्याच्या सक्षमीकरनावर भर दिला आणि त्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. ते लाल बहादूर शास्त्री यांच्या सरकार मध्ये 1965 साली भारत पाकिस्तान युद्ध झाले तेव्हाही संरक्षण मंत्री होते.
1962 साली ते नाशिक मधून लोकसभेवर निवडून गेले. नेहरूनंतर यशवंतराव हेच भारताचे पंतप्रधान व्हायला पाहिजे होते पण तसं नाही झालं. 14 नोव्हेंबर 1966 साली इंदिरा गांधींच्या सरकार मध्ये ते गृह मंत्री झाले.
26 जून 1970 साली इंदीरा गांधींनी त्यांना अर्थ मंत्री केले. 1960-70 च्या दशकात जेव्हा यशवंतरवांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशात उमटवला होता तेव्हा त्यांना देशात “प्रतिशिवाजी” म्हणून ओळखले जात होते. एखाद्या माणसाला “प्रतिशिवाजी” म्हनुन नावाजले जाते तेव्हा त्याचे काम कसे असेल याचा अंदाज येईल.
“जनतेचा राजा” असलेल्या राजांची उपाधी ह्या “लोकनेत्याला” मिळाली ही काही साधी गोष्ट नाही.
11 ऑक्टोबर 1974 साली ते परराष्ट्र मंत्री झाले. जून 1975 मध्ये भारतात आणीबाणी लागू झाली.
आणी बाणी नंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. स्वतः इंदिरा गांधींचा सुद्धा पराभव झाला पण यशवंतराव महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून आले होते. त्यावेळी ते संसदेत विरोधीपक्षनेते झाले. 1978 च्या शेवटी बंगलोर मध्ये झालेल्या काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात काँगेस मध्ये दुफळी झाली. इंदिरा काँग्रेस आणि काँग्रेस अश्या 2 संघटना एकमेकांसमोर उभ्या राहिल्या. यशवंतरावांना इंदिरा गांधींचे वर्चस्व देशहिताच्या दृष्टीने ठीक नाही वाटले आणि त्यांनी इंदिरा गांधींची साथ सोडली. इंदिरा गांधींची साथ सोडल्यांमुळे त्यांच्या राजकीय जीवनाचे बरेच नुकसान झाले. पुढे 1979 साली चरण सिंघांचे काही काळासाठी सरकार बनले त्यात ते गृह मंत्री आणि भारताचे उप पंतप्रधान झाले.
जानेवारी 1980 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसचा मोठा विजय झाला आणि इंदिरा गांधी परत सत्येत आल्या. त्यावेळी महाराष्ट्रातून दुसऱ्या काँग्रेसचे फक्त यशवंतरावच लोकसभेत गेले होते. यशवंतरावांना निवडून यायला कोणत्या पार्टीचे किंवा व्यक्तीच्या नावाची गरज न्हवती. यशवंतरावांचे कामच तसे होते की ते लोकांच्या गळ्यातील ताईत झाले होते. शेवटी नाईलाजने 6 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्यांची इंदिरा काँग्रेस मध्ये वापसी झाली.
1982 साली त्यांची 8व्या वित्तीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली.
25 नोव्हेम्बर 1984 ला दिल्लीत हृदय विकाराच्या झटक्याने यशवंतरावांचा मृत्यू झाला. यशवंतरावांच्या जान्याने पूर्ण महाराष्ट्र पोरका झाला पण आपल्या मागे महाराष्ट्राची धुरा योग्य रीतीने सांभाळू शकतील असे शरद पवारांसारखे नेते यशवंतरावांनी आपल्या हयातीत निर्माण केले. पवार राजकारणात आले ते यशवंतरावांमुळेच आणि त्याच पवारांनी यशवंतरावांच्या विचारांवर चालून महाराष्ट्राला पुढे एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.
यशवंतराव म्हणजे दीन दुबळ्यांचा आणि कष्टकऱ्यांच्या आधार. याचीच एक आठवण पुढीलप्रमाणे चंद्रभागा नदीला अडवणारा खराखुरा विठ्ठल: तुझी चंद्रभागा मी आज अडवली आहे. मला माफ कर.. तुझ्या भक्तांना स्नानाला पाणी मिळणार नाही पण आषाढी कार्तिकीला हरिनामाचा गजर करीत, ग्यानबा-तुकारामाच्या जयघोषात महाराष्ट्राचा जो गरीब शेतकरी तुझ्या दर्शनाला आसुसलेला आहे त्याच्यासाठीच मी चंद्रभागा अडवली आहे. विठुराया, तुझ्या चंद्रभागेचे पाणी माझ्या शेतक-याच्या शेताशेतात जाईल. मनगटासारखी कणसे येतील आणि त्या कणसातील जोंधळयाच्या प्रत्येक दाण्यात माझ्या शेतक-याला महाराष्ट्राचा हा समाजवादी देव पाहता येईल… दुरदृष्टी असलेला विठ्ठल! ऊजनी (यशवंतसागर) धरणाचा जलसाठा आज 70% च्या आसपास होईल. त्यामुळे सोलापूर व ऊजनीच्या परिसरातील तीन चार जिल्ह्यातील शेतक-यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले. खरेतर ऊजनीचे पाणी जेव्हा जेव्हा पाहतो तेव्हा तेव्हा शेतकरी म्हणून मी आ.यशवंतराव चव्हाण साहेब यांचे आभार मानतो कृतज्ञता व्यक्त करतो. ऊजनी धरण जेव्हा तयार झाले. उजनी धरणाच्या उध्दाटनाला यशवंतराव चव्हाण जेव्हा निघाले तेव्हा ते धरणाच्या बांधावर जाण्यापूर्वी पंढरपूरला विठुरायाच्या पायाशी आले. त्यांनी पांडुरंगाच्या पायावर डोके ठेवले. सद्गदीत झालेल्या यशवंतरावांनी विठुरायाची माफी मागितली.
असे होते यशवंतराव राजकारण कमी आणि समाजकारण जास्त. म्हणूनच तर त्यांना “प्रतिशिवाजी” आणि “आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार” म्हटले जाते. सत्तेसाठी लालची असलेल्या लोकांमध्ये राहून यशवंतरावांनी कधीच आपल्या मनात सत्तेची लालसा येऊ दिली नाही. यशवंतरावांच्या मृत्यूनंतर यशवंतरावांच्या नावाने खूप संस्था चालू झाल्या “यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची” स्थापना झाली.
2009 साली “मुंबई पुणे द्रुतगती” तयार झाला तो भारतातील पहिला द्रुतगती मार्ग होता त्याचे नामकरण झाले “यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती मार्ग”.
यशवंतराव एक अभ्यासू वक्ता म्हणून पूर्ण देशात नावाजले गेले होते. त्यांची भाषणे अत्यंत अभ्यासपूर्ण असत आणि तळागाळातील माणसाच्या भावना त्यातून मांडलेल्या असत. त्यांनी स्वतःच जीवन चरित्र 3 भागात लिहायचं ठरवलं होतं पण त्यांच्या हयातीत त्यांचा एकच भाग लिहून झाला.
त्यांचे गाव कृष्णा नदीच्या तीरावर वसले असल्याने त्यांनी त्याला नाव दिले “कृष्णाकाठ”. असा हा मायभूमीवर प्रचंड प्रेम असणारा. तळागाळातील समाजावर होणाऱ्या अन्यायाची जाण असणारा आणि त्यांना मुख्य प्रवाहामध्ये सामील करून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करणारा नेता.
“हिमालयाच्या मदतीला धावून जाणार सह्यादी”. प्रगत महाराष्ट्राचे स्वप्न ज्यांनी बघितलं ते हे यशवंतराव. ज्यांनी पदाला नाही तर माणसाला महत्व दिले असे हे यशवंतराव. ज्यांचा आदर्श आजच्या प्रत्येक राजकारण्यांनी घ्यायला पाहिजे असे हे यशवंतराव. महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत असा हा जनतेचा कैवारी जन्माला आला याचा सार्थ अभिमान आहे.
-अक्षय जाधव
कडूस राजगुरूनगर.
यशवंतराव चव्हाण यांचाबद्दल ही माहिती Yashwantrao Chavan Information Biography Essay in Marathi Language yashwantrao chavan Jivan Charitra यशवंतराव चव्हाण निबंध भाषण मराठी माहिती कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा.
College Catta या आपल्या आवडत्या वेबसाईट पुन्हा भेट द्या, College Catta म्हणजे माहितीचे व्यासपीठ! जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी महत्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत सादर केली जाते.
Atal Bihari Vajpayee Information Biography History in Marathi language
Leave a Reply