हा शिवचरित्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थाचा गौरव आहे असं बाबासाहेब पुरंदरे का म्हणाले होते जाणून घ्या… Shivshahir Babasaheb Purandare information in Marathi
शिवशाहीर म्हणून अखंड महाराष्ट्राला परिचित असणारे. आयुष्याची शंभरी गाठल्यावर भारताचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी शुभेच्छा देताना म्हटले की बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांना घराघरात पोहचविले. जर १२५ वर्षांचं आयुष्य मिळालं तर शिवचरित्र ब्रह्मांडाच्या पलीकडे घेऊन जाईल,’ असा विश्वास व्यक्त करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरेंनी आपल्या आयुष्याची शंभरी अलिकडेच गाठली. बाबासाहेब पुरंदरे आणि शिवचरित्राचं नातं अतूट आहे. शिवाजी महाराजांच्या चरित्राचे अभ्यासक आणि संशोधक असले तरी ते स्वतःला इतिहासकार म्हणवून घेत नाहीत. त्यांच्याबद्दल जिव्हाळा वाटणारे लोक त्यांना “शिवशाहीर” म्हणतात, पण त्यापुढे जाऊन ते म्हणतात की “मला काही म्हटलं नाही तरी चालेल. पण शिवचरित्र वाचा.” शिवशाहीर असून तितकेच विवादास्पद व्यक्तिमत्व म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे.
बळवंत मोरेश्वर पुरंदरे माहिती
Babasaheb Purandare Biography in Marathi
आज आपल्या महाराजांचे चरित्र संपूर्ण महाराष्ट्राला सांगणाऱ्या व्यक्तिविषयी माहिती घेऊया.
बळवंत मोरोपंत पुरंदरेंचा जन्म २९ जुलै १९२२ ला झाला. सुरुवातीला त्यांच्या पुस्तकांवर हेच नाव असायचं, पण अवघा महाराष्ट्र त्यांना बाबासाहेब पुरंदरे याच नावाने ओळखतो.सरदार घराण्याचे खानदानी संस्कार, रक्तातच मुरलेलं देशप्रेम अन् शिवचरित्र निष्ठा, कलावंताचं मन अन देण्यासाठीच धन अशा स्वरूपाचा वारसा, सरदार आबासाहेब मुजुमदारांपासून बालगंधर्वांपर्यंत आणि काकासाहेब केळकरांपासून आचार्य अत्रे यांच्यापर्यंत विविध क्षेत्रातील दिग्गजांचा पुरंदरे वाड्याच्या सदरेवर लाभलेला सहवास, पेरुगेट भावे स्कूलमधील शिक्षक आणि नानासाहेब नारळकर यांच्यासारख्या दुसऱ्या संस्थेतील शिक्षकांनीही केलेले संस्कार अन मार्गदर्शन, शाळकरी वयातच लागलेली इतिहासविषयक लेखनाची आणि कथाकथनाची आवड, शिवचरित्राबद्दलचा विलक्षण आदर या साऱ्यामुळं कुमार अन तरुण वयातल्या बळवंतराव पुरंदरे यांची पाऊले शिवचरित्राकडे वळू लागली आणि माहिती घेण्यासाठी धडपड सुरु झाली.
बाबासाहेब पुरंदरे पुस्तके माहिती
लहानपणी वाढदिवसाला एखादं खेळण, खाऊ किंवा फार फार तर आवडतं पुस्तक भेट म्हणून मिळावं, म्हणून अनेक जण हट्ट करतात. पण पुरंदरेंनी आपल्या आठव्या वाढदिवसाला वेगळाच हट्ट आपल्या वडिलांकडे केला. तो म्हणजे सिंहगड पाहायचा आहे. या हट्टाला काय उत्तर द्यावं, त्यांच्या वडिलांना कळेना. पण त्यांनी त्यांचा हट्ट पुरवला. त्यांनी आपल्या वडिलांकडून शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरेंच्या गोष्टी ऐकल्या होत्या. त्या कथा त्यांच्यासमोर जिवंत झाल्या, अशी आठवण ‘बेलभंडारा’मध्ये आहे. बळवंतराव मोरेश्वरराव पुरंदरे ते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हा जीवनप्रवास म्हणजे जणू आता एका शतकाची तपश्चर्याच आहे, असं म्हणावं लागेल. बाबासाहेबांनी संशोधनातील कागदपत्रं नुसती वाचली नाहीत, त्या सनावळ्यांमध्ये ते केवळ गुंतून पडले नाहीत, भावनेच्या आहारीही गेले नाहीत, तर त्यांनी इतिहासाचार्य राजवाडे आणि खऱ्यांची परंपरा सांभाळतानाच, संत ज्ञानेश्वरांची महाराष्ट्ररसातील लेखणीही आत्मसात करून इतिहास जिवंत केला. तो मराठी मनांमध्ये पेरला, जागवला अन् त्यातूनच चार पिढ्यांवर शिवचरित्राचे संस्कार होत गेले.
शाळेतल्या ऑफ तासाला शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आग्रहापायी केलेल्या ऐतिहासिक कथाकथनाला अभ्यासाची, संशोधनाची जोड मिळाली. मग दादरा-नगर हवेलीच्या स्वातंत्र्य संग्रामात ऐन दमणगंगेच्या काठी स्वातंत्र्यसैनिकांना प्रेरणा देणारी शिवचरित्रावरील त्यांची भाषणे झाली.
१९५४ पासून सुरू झाला एका विश्वविक्रमाचा चैतन्यदायी प्रवास. प्रामुख्यानं शिवचरित्र या एकाच विषयावर जाहीरपणे गेली ८० वर्षं बोलणारे अन् लिहणारे बाबासाहेब पुरंदरे हे त्या विश्वाविक्रमाचं नाव. या अक्षर प्रवासातूनच मग साकारली ‘सावित्री’, ‘जाळत्या ठिणग्या’, ‘मुजऱ्याचे मानकरी’, ‘राजा शिवछत्रपती’, ‘महाराज’, ‘शेलारखिंड’, ‘पुरंदऱ्यांचा सरकारवाडा’, ‘शनवारवाड्यातील शमादान’, ‘शिलंगणाचं सोनं’, ‘पुरंदरच्या बुरुजावरून’, ‘कलावंतिणीचा सज्जा’, ‘महाराजांची राजचिन्हे’, ‘पुरंदऱ्यांची नौबत’ अशी अस्सल मऱ्हाटमोळी साहित्यसंपदा.पोर्तुगीज सरकारने दादरा-नगर हवेली प्रश्नी आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताविरुद्ध दाखल केलेल्या खटल्याप्रकरणी, पंडित नेहरूंनी अभ्यासक, संशोधकांची ‘गोवा युनिट’ नावाची समिती स्थापन केली होती. भारताची बाजू पटवून देण्यासाठी आवश्यक ते पुरावे गोळा करण्याची अत्यंत महत्त्वाची आणि जोखमीची जबाबदारी या समितीवर होती. तरुण संशोधक-अभ्यासक या नात्यानं बाबासाहेबांचाही तीत समावेश होता. भारताच्या बाजूनं पुरावे गोळा करण्यासाठी त्यांनी जीव धोक्यात घालून काम केलं होतं. स्वातंत्र्यसैनिक बाबासाहेबांच्या या योगदानाची दखल घेणं जरुरीचं आहे.
१९७४ मध्ये शिवराज्याभिषेकाच्या त्रिशताब्दी वर्षात मुंबईतील शिवाजी पार्कवर त्यांनी उभारलेल्या शिवसृष्टीत राज्याभिषेकाचा जिवंत प्रसंग दाखवण्यात आला होता. यातूनच पुढं ‘जाणता राजा’ या महानाट्याची निर्मिती झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी १४ एप्रिल १९८४ रोजी या महानाट्याचा पुण्यात शुभारंभ करण्यात आला. भारतातील अनेक राज्यं आणि अमेरिकेत मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून या महानाट्याचे हजारांपेक्षा अधिक प्रयोग झाले आहेत; त्यामुळं विविध संस्था, संघटना आणि प्रकल्पांसाठी कोट्यवधी रुपये संयोजक संस्थांना मिळाले. महाराष्ट्रभरात हजारो कलाकार तयार झाले.
२०१५ मध्ये महाराष्ट्र शासनाचा महराष्ट्र भूषण पुरस्कार बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर करण्यात आला होता. हा पुरस्कार त्यांना मिळू नये अशी मागणी देखील काही संघटनांनी केली होती. ‘दादोजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे गुरू होते हा असत्य इतिहास बाबासाहेब पुरंदरे यांनी मांडला‘, हा त्यांच्यावरील मुख्य आक्षेप त्यावेळी होता. त्यांच्यावर झालेल्या आरोपानंतर काही राजकीय पक्ष देखील समोरासमोर आले होते. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या निवडीवर विरोध दर्शवला होता तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुरंदरे यांचं समर्थन केलं होतं.
महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या १० लाख रकमेपैकी फक्त १० पैसे स्वतःकडे ठेऊन त्यात १५ लाख स्वतःचे घालून ती रक्कम पुरंदरे यांनी दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाला मदत म्हणून दिली होती. बाबासाहेब पुरंदरे यांच्यामुळे इतर लोकांनी वाद केलेले आपल्याला दिसतील. पण ते स्वतःहून कोणत्या वादात अडकले, असं दिसत नाही. त्यांच्यात एक अलिप्तपणा आहे. स्वतःच्या कार्याकडे ते एका वेगळ्या दृष्टीने पाहतात असं वाटतं. ते स्वतःच्या कार्याबद्दल ‘बेलभंडारा’मध्ये सांगतात, “मी जे काही केलं ते टीपकागदा प्रमाणे आहे. माझी स्वतःची बुद्धिमत्ता वा प्रतिभा मला स्वतःला कुठेच जाणवत नाही. जुन्या कागदपत्रातील आणि मावळी खेड्यापाड्यातील लोकांची भाषा मी जरा आलटून पालटून लिहिली आहे. लिहिलं आहे ते सत्यच आहे. पण माझं काय आहे? मी टीपकागद आहे. हा माझा विनय नाही प्रामाणिकपणा आहे.”
पद्मविभूषण मिळाल्यानंतर माध्यमांनी त्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी हे उत्तर दिलं, “छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवकाळ यांचा शोध घेण्यासाठी सबंध आयुष्य वेचलेल्या एका विद्यार्थ्यांचा हा गौरव आहे. ज्या शिवचरित्रासाठी मी रानोमाळ हिंडलो, दऱ्याखोऱ्या भटकलो, कागदपत्रे गोळा केली, त्याचे अर्थ लावले त्या प्रदीर्घ अभ्यासाचा हा गौरव आहे. शिवचरित्राचा हा गौरव आहे.”
अक्षय जाधव कॉलेज कट्टा.
मित्रांनो, बाबासाहेब पुरंदरे यांच्याबद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा. कॉलेज कट्टा म्हणजे माहिती आणि मनोरंजनाचे व्यासपीठ!
Leave a Reply