हुतात्मा शिवराम हरी राजगुरू महाराष्ट्राचा या वीर पुत्रा विषयी महत्वपूर्ण माहिती. Shivram Hari Rajguru Information Biography in Marathi language
Shivram Hari Rajguru Information Biography in Marathi language
शिवराम हरी राजगुरू माहिती निबंध भाषण मराठी
भारताचा स्वातंत्र्यसंग्राम म्हणजे शेकडो क्रांतिकारकांची आणि देशभक्तांची शौर्यगाथा! या अग्निकुंडात अनेक क्रांतिकरकांची बलिदाने आहेत.
“आझादी खून मांगती हैं।” असं म्हणतात याच आझादीसाठी अनेक तरुणांनी आपले बलिदान दिले.
या स्वातंत्र्यसंग्रामात पूर्ण इंग्रज सरकारला हदरवणारे एक ‘त्रिकुट’ होते. या त्रिकुटाच नाव म्हणजे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू.
या त्रिकुटातीलच एक ज्याने मृत्यूला हसत हसत आलिंगन दिले, महाराष्ट्राच्या मातीतला हा थोर क्रांतिकारक “हुतात्मा शिवराम हरी राजगुरू.”
“सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है ज़ोर कितना बाज़ु-ए-कातिल में है?”
शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्रातील माती आणि ज्ञानोबा माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेलं खेड हे पुणे जिल्ह्यातील गाव! याच ‘खेड’ गावात भारतमातेच्या या ‘रत्नाचा’ म्हणजेच “शिवराम हरी राजगुरू” यांचा जन्म 24 ऑगस्ट 1908 रोजी झाला.
त्यांच्या वडिलांचे नाव ‘हरी नारायण’ तर आईचे नाव ‘पार्वती’ होते. लहानपणी त्यांना ‘रघुनाथ’ या नावाने ओळखले जात होते. राजगुरू 6 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले तेव्हा त्यांचे संगोपन त्यांच्या आई आणि त्यांच्या मोठ्या भावाने केलं. राजगुरूंचे सुरुवातीचे शिक्षण पुण्यात नूतन मराठी शाळेत झाले. ब्राम्हण कुटुंबातील असल्याने ग्रंथांशी त्यांचे जवळचे नाते होते. त्यातूनच त्यांना अध्यात्माची आवड निर्माण झाली. त्यांना अचूक नेमबाजी आणि अफाट स्मरणशक्ती यांचे जणू वरदानच लाभले होते.
14 वर्षाचे असताना राजगुरूंनी घर सोडले. त्यांनतर त्यांनी काही काळ नाशिकला वास्तव्य केले. पुढे ते शिक्षणासाठी काशीला गेले. तिथं वेदशास्त्रात संपन्न होऊन “तर्कतीर्थ” ही पदवी त्यांनी संपादन केली. राजगुरू यांचे मराठी बरोबरच इंग्रजी, कानडी, उर्दू, मल्याळम या भाषांवर देखील प्रभुत्व होते.
Shivram Hari Rajguru Information Biography in Marathi language
शिवराम हरी राजगुरू माहिती निबंध भाषण मराठी
राजगुरूंचा कल होता अध्यात्माकडे आपण पंडित व्हावं अशी त्यांची इच्छा होती पण म्हणतात ना दैवाला जे वाटत तेच होते. राजगुरूंची ओळख बाबाराव सावरकरांशी झाली. त्यांच्या मुळेच राजगुरू अमरावतीला शारीरिक शिक्षणाच्या वर्गात गेले आणि तिथला अभ्यास पूर्ण करून ते विशारदही झाले.
वेगवेगळ्या भाषांवर प्रभुत्व असणारे राजगुरू जेव्हा राजकारणात आले तेव्हा त्यांच्या वृत्तीने ते “क्रांतिकारक” बनले. काशीमध्येच राजगुरूंचा परिचय भारतमातेच्या अजून एका वीर सुपुत्राशी आला त्यांचं नाव म्हणजे चंद्रशेखर आझाद!
राजगुरूंच्या वेगवेगळ्या भाषेंवर असणारे प्रभुत्व आणि प्रसंगी मरण्यासाठी आणि मारण्यासाठी ही तयार असणारे निडर वयक्तिमत्व यामुळे आझादांनी राजगुरुंना क्रांतिकारकांच्या गटात सामील करून घेतले. तिथूनच या वीर पुत्राचा आपल्या भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व त्याग करून प्राणांचीही आहुती देण्याचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. क्रांतीमय वातावरणात राजगुरूनमधला क्रांतिकारक घडत होता कोणत्याही मोहिमेसाठी ते नेहमी एका पायावर तयार असायचे. तिथेच त्यांची ओळख भगतसिंग, सुखदेव आणि अन्य क्रांतिकारकांशी झाली. पुढे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू याच त्रिकूटाने इंग्रजांना सळो की पळो करून सोडले.
ऑक्टोबर 1928 मध्ये सायमन कमिशन विरोधात आंदोलन करत असताना इंग्रज सरकारने केलेल्या लाठीहल्ल्यात “पंजाबचा सिंह” म्हणून ओळखले जाणारे “लाला लजपतराय” यांचा मृत्यू झाला. लाठीहल्ला करण्याचा आदेश देणारा इंग्रज अधिकारी स्कॉटचा वध करायचा असा निर्धार भगतसिंग यांनी केला. भगतसिंग, राजगुरू आणि जयगोपाल हे तिघे या योजनेत सहभागी होते.
जयगोपाल पोलीस स्टेशनवर स्कॉटच्या हालचालींवर लक्ष ठेऊन होते. 4-5 दिवस स्कॉट त्या भागात आलाच नाही नंतर एक गोरा पोलीस अधिकारी आला जयगोपालला वाटले स्कॉट आहे म्हणून त्याने दबा धरून बसलेल्या भगतसिंग आणि राजगुरुंना खून केली. भगतसिंगांना वाटले तो स्कॉट नसावा भगतसिंगांनी नकार देण्यापूर्वीच राजगुरूंनी त्यावर गोळ्या झाडल्या.
परिस्तिति हाताबाहेर जाऊ नये म्हणून भगतसिंगांनी सलग 8 गोळ्या झाडून त्या अधिकाऱ्याला यमसदनी पाठवले नंतर दोघांना कळले की तो स्कॉट नवता साँडर्स होता. माणूस चुकला पण योजना यशस्वी झाली. पोलीस मारेकऱ्यांच्या मागे हाथ धुवून लागले होते. राजगुरू आणि भगतसिंग दिवसाढवळ्या वेषांतर करून एकाच गाडीतून राजकोटला निसटले.
फितुरी हा भारताला लागलेला रोग आहे. जेवढं नुकसान बाहेरच्या लोकांमुळे नाही झाले त्यापेक्षा जास्त नुकसान आपल्यातल्या फितुरांमुळे झालंय. ह्याच फितुरीमुळे राजगुरू सप्टेंबर 1929 ला पुण्यामध्ये पोलिसांच्या हाती आले. त्यांनंतर त्यांना लाहोर मध्ये कारागृहात ठेवण्यात आले. कारागृहात त्यांनी आपल्या साथीदारांची नावे सांगावी म्हणून त्यांचे अतोनात हाल करण्यात आले. त्यांनी साक्षीदारांची नावे सांगावी म्हणून त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले गेले. तीव्र उन्हाळ्यात भट्ट्या लावून राजगुरुंना त्यामध्ये बसवण्यात आले होते डोक्यावरन विष्ठेच्या टोपल्या ओतल्या. किती तरी दिवस अन्न पाण्याव्यतिरीक्त ठेवलं होतं तरी त्यांनी आपल्या सहकाऱ्यांची नावे सांगितली नाही. त्यांनी शेवट पर्यंत आपला क्रांतिकारी बाणा सोडला नाही. पुढे सुखदेव आणि भगतसिंग यांनाही अटक झाली आणि लाहोर करगृहातच ठेवले तेथे परत या त्रिकुटाची भेट झाली. अखेर लाहोरच्या खटल्याचा निकाल आला आणि साँडर्सच्या वधाच्या आरोपाखाली तिघांना फाशीची शिक्षा झाली.
त्यांच्या फाशीची तारीख कोर्टाने 24 मार्च 1931 ठरवलेली होती पण त्याच्या 11 तास आधीच म्हणजे 23 मार्च 1931 रोजी भारतमातेच्या या वीर सुपुत्रांना फाशी देण्यात आली. ज्या वयात आजच्या युवकांना आपल्याला काय करायचंय हे कळत नाही त्याच वयात या युवकांनी आपल्या मातृभूमीसाठी प्राणांची आहुती दिली होती. फक्त 23 वर्षे वय असताना राजगुरू हसत हसत फासावर चढले होते.
“मेरा रंग दे बसंती चोला माये रंग दे” अस म्हणत या वीरांनी हातानी फास आपल्या गळ्यात घातला.
23 मार्च हा दिवस “शहिद दिवस” म्हणून साजरा करतात. एक गोष्ट बोलावी वाटते या क्रांतिकरकांबद्दल!
ना जाणे कितने झुलें थे फांसी पर। कितनों ने गोलियां खायी थी।
फिर क्यूँ झूठ बोलते हो साहब के सिर्फ चरखे से आझादी आई थी।
राजगुरूंच्या नावाने त्यांच्या जन्मगाव असणाऱ्या खेडला “राजगुरूनगर” अस नाव दिले गेले.
भारतमातेच्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या अग्निकुंडात स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या या थोर क्रांतिकारकाला शत शत नमन…
-अक्षय जाधव.
कडूस राजगुरूनगर.
मित्रांनो ही Shivram Hari Rajguru Information Biography in Marathi language शिवराम हरी राजगुरू माहिती निबंध भाषण मराठी माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा.
आपल्या आवडत्या कॉलेज कट्टा या संकेतस्थळाला पुन्हा अवश्य भेट द्या. कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ! जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी महत्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत सादर केली जाते.
Leave a Reply