माझी मुख्यमंत्री नारायण राणे यांची कारकीर्द एक कट्टर शिवसैनिक म्हणून झाली, त्यांचा राजकीय प्रवास जाणून घ्या… Narayan Rane information Biography in Marathi नारायण राणे मराठी माहिती .

पंतप्रधान मोदी यांच्या कैबिनेटच्या विस्तारात महाराष्ट्रातून मंत्रिपदाची माळ ज्यांच्या गळ्यात पडली ते नारायण राणे.
आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन आणि राणे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर भाष्य करण्याची पद्धत लक्षात घेऊन राणे यांना मंत्रिपद मिळाले यात काही नवल नाही. शिवसेनेला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचे कौशल्य नारायण राणे यांच्याकडे नक्कीच आहे आणि गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात जो काही राडा सुरु आहे त्यावरून नक्कीच हे सिद्ध होते. म्हणून आज नारायण राणे याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया.
नारायण राणे हे फायटर नेते म्हणून ओळखले जातात. राजकारणात अनेक चढउतार पाहणाऱ्या या नेत्याने आपला दबदबा मात्र कायम राखला. ६९ वर्षीय नारायण राणे गेल्या ५० वर्षांहून अधिक काळापासून महाराष्ट्राच्या राजकारणात असून केंद्रात मंत्री म्हणून काम करत असताना मात्र त्यांचा चांगलाच कस लागणार आहे.
नारायण राणे यांचा राजकीय प्रवास
मोदी मंत्रिमंडळाच्या विस्तारात पहिलं स्थान पटकावणाऱ्या राणे यांचा राजकीय प्रवास सर्वांनाच थक्क करणारा आहे. नारायण तातू राणे यांचा जन्म २० एप्रिल १९५२ रोजी कोकणात झाला. मोठा जनाधार असलेल्या कोकणातील नेत्यांमध्ये नारायण राणेंचा समावेश होतो. राजकारणात येण्या अगोदर नारायण राणे यांनी मित्रा सोबत सुभाष नगर येथे चिकन शॉप सुरु केले होते.
नारायण राणे यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली ती शिवसेनेतून. अवघं १६ वर्षे वय असताना राणे शिवसेनेचे सदस्य म्हणजेच शिवसैनिक होते. वयाच्या २० व्या वर्षी नारायण राणे यांना शिवसेनेत चेंबूर येथे शाखा प्रमुख पद देण्यात आले. आक्रमक स्वभावामुळे ते सुरुवातीपासूनच चर्चेत राहिले. याच आक्रमकतेमुळे त्यांना पुढे चेंबूरचं शाखाप्रमुखपद देण्यात आलं. मग राणे यांचा राजकारणातील आलेख चढताच राहिला.
राणे मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले आणि त्यानंतर पक्षात संधीची दारे त्यांच्यासाठी उघडत गेली. अर्थात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा त्यांच्यावर खास विश्वास होता. त्यामुळेच राणे यांचं राजकारणात आणि शिवसेनेतही वजन वाढत गेलं. त्यामुळेच राणे यांचं राजकारणात आणि शिवसेनेतही वजन वाढत गेलं.
१९८५ ते १९९० या काळात नगरसेवक असताना बेस्टचे अध्यक्षपद राणेंना मिळाले. त्यानंतर १९९० च्या निवडणुकीत राणे निवडून आले व प्रथमच महराष्ट्र विधानसभेत पोहचले. त्यानंतर सलग तीनवेळा ते विधानसभेवर निवडून गेले. मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना भाजप युती सरकारमध्ये राणे हे महसूल मंत्री होती.
१९९९ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी मोठा निर्णय घेत मनोहर जोशी यांचा राजीनामा घेतला आणि राणे यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवली. साधारण सात महिने राणे मुख्यमंत्री होते. मात्र नंतर झालेल्या निवडणुकीनंतर धक्कादायकरित्या युतीच्या हातून सत्ता निसटली.
२००५ पर्यंत राणे विरोधी पक्षनेते राहिले. त्यानंतर मात्र राणे यांच्या राजकीय प्रवासाचीही दिशा बदलत गेली.
नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यात वर्चस्वाच्या लढाईतून शीतयुद्ध सुरू झालं आणि त्यातूनच जुलै २००५ मध्ये बाळासाहेबांनी राणे यांना शिवसेनेतून बाहेरचा रस्ता दाखवला. महत्त्वाकांक्षी राजकारणी अशी ओळख असलेले राणे नंतर काँग्रेसमध्ये गेले. तिथे मुख्यमंत्रिपद दिले जाईल, अशी त्यांना आशा होती. तसे आश्वासनही त्यांनी मिळवले होते. मात्र विलासराव देशमुख यांनी राणे यांचा स्वप्नभंग केला. आधी महसूल आणि नंतर उद्योग या खात्यांवरच राणे यांना समाधान मानावे लागले.
२०१४ मध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद असताना राणे यांनी त्यांच्या नेतृत्वाला उघड आव्हान दिलं. त्यात पुत्र नीलेश राणे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राणे यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन करत वेगळी राजकीय वाटचाल सुरू केली. मात्र २०१७ मध्ये स्थापन झालेला हा पक्ष अल्पजीवी ठरला. २०१९ मध्ये राणे यांनी आपला पक्ष भाजपात विलीन केला आणि त्यांच्यासह त्यांचे सर्व समर्थक भाजपात गेले. राणे यांच्यासाठी हा निर्णय राजकीयदृष्ट्या फायद्याचा ठरल्याचेच दिसत आहे. राणे यांना भाजपने राज्यसभा सदस्य केलं आणि आता केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन त्यांना राजकीय बळही दिलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सिंधुदुर्ग दौऱ्यात राणे यांच्यावर अन्याय होणार नाही, असे म्हटले होते. तो शब्द राणेंना मंत्रिपद देऊन भाजप नेतृत्वाने पाळला आहे.
राणे यांच्यावर भाजपने विश्वास टाकला असताना राणे यांच्यावरही आता मोठी जबाबदारी असणार आहे. राणे हे मूळचे शिवसैनिक असले तरी सध्या शिवसेना आणि राणे यांच्यात विस्तवही जात नाही. त्यातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राणे हे सातत्याने लक्ष्य करत आले आहेत. शिवसेना-भाजप युती तुटल्याच्या पार्श्वभूमीवर राणेंचा हा आक्रमकपणा भाजपसाठी फायदेशीर ठरणार आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राणे यांनी कोकणात भाजपला मोठे यश मिळवून दिले. असेच यश मुंबई महापालिका निवडणुकीत मिळवण्यासाठी राणे यांची मदत होईल अशी आशा भाजपला आहे. याशिवाय मराठा नेता म्हणूनही राणे यांच्याकडे भाजप पाहत आहे.
अश्या प्रकारे कायम सत्ताकेंद्रात असलेले राणे सध्या तरी आपल्या विधानांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना घायाळ करत आहेत. मुंबई मनपा च्या निवडणुकीत नारायण राणे हेच भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा प्रमुख चेहरा राहणार यात आता काही शंका नाही शिवसेना आणि राणे यांतील संघर्षात पुढील काळात महाराष्ट्रातील राजकारण ढवळून जाणार यात काहीच शंका नाही. राणे ज्या प्रमाणे शिवसेनेवर तूटून पडले आहेत पण त्यांनी त्यांना मिळालेल्या खात्याचा उपयोग कोकण वासियांसाठी करावा हीच प्रत्येक कोकण वासियांची इच्छा असेल.
अक्षय जाधव.
कॉलेज कट्टा.
मित्रांनो, Narayan Rane information Biography in Marathi
नारायण राणे मराठी माहिती तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया द्या… कॉलेज कट्टा म्हणजे माहिती आणि मनोरंजनाचे व्यासपीठ!
Leave a Reply