सोनिया गांधींचा संघर्ष हा फक्त राजकीय नसून, त्यांना भारतीय न ठरवणे, त्यांच्या देशभक्तीवर आक्षेप घेणे आणि त्याच बरोबर इंटरनेट या माध्यमांद्वारे त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे काम विरोधकांनी केले पण त्या डगमगल्या नाहीत… त्यांचाबद्दल महत्वपूर्ण माहिती. सोनिया गांधी यांचा इतिहास माहिती जीवन परिचय मराठी Sonia Gandhi Information Biography History in Marathi Language
सोनिया गांधी यांचा इतिहास माहिती जीवन परिचय मराठी
एक छोटी मुलगी असते. स्वभावाने गरीब असते. एका खानावळीत धुणीभांडी करत असते आणि अशातच एके दिवशी त्या खानावळीत आणि पर्यायाने त्या मुलीच्या आयुष्यात एक राजकुमार येतो. त्यांच्यात मैत्री वाढत जाते, ते एकमेकांच्या प्रेमात पडतात, लग्न करतात आणि ती एक सर्वसामान्य मुलगी एका देशाची राणी होते. अशी एखादी गोष्ट परीकथांमध्ये, राजकुमारी-राजकुमाराच्या गोष्टींमध्ये रमण्याची गोष्ट तुम्ही नक्की ऐकली असेल पण अशीच काही गोष्ट आहे आपल्या देशातल्या सर्वात प्रबळ महिला असलेल्या सोनिया गांधी यांची!
सोनिया गांधी या मूळ इटालियन वंशाच्या आहेत. हे सगळ्यांनाच माहित असेल. आज त्यांच्या संघर्षाची गोष्ट जाणून घेऊया.
इटलीतल्या व्हेनिटो प्रांतातल्या ल्युसियाना या गावात स्टेफिनो माईनो नावाचा एक इटलीतल्या बेनिटो मुसोलिनीच्या फॅसिस्ट सैन्यातला आणि दुसऱ्या महायुद्धात नाझी सैन्यासोबत फॅसिस्ट सैन्याने सोव्हिएत युनियनशी पुकारलेल्या युद्धात लढलेला सैनिक राहत होता.
9 डिसेंबर 1946 साली, फॅसिस्ट शिपाई स्टेफिनो मायनो आणि त्यांची पत्नी पावलो मायनो यांच्या पोटी एक कन्यारत्न जन्माला आलं. यथावकाश त्या लहानग्या परीचं नाव ‘एड्विज अँटोनिया अल्बिना माईनो’ असं ठेवण्यात आलं, ह्याच त्या आजच्या ‘सोनिया गांधी’! (काही ठिकाणी त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव ‘सोनिया माईनो’ असं दाखवण्यात येत असलं तरीही त्यात तथ्य नाही. ते अँटोनियाच असल्याचं सिद्ध झालेलं आहे.)
Sonia Gandhi Information Biography History in Marathi Language
ऍन्टोनिया लहान असताना स्टेफिनो पाच वर्षांचा सश्रम कारावास भोगून रशियातून परतला आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी त्याने एखाद्या शहरात स्थलांतरित व्हायचा निर्णय घेतला. त्यानंतर माईनो परिवार तुरिन प्रांतातल्या ऑरबेसेनो शहरात स्थलांतरित झाला. पूर्वी गवंडीकाम केलेल्या स्टेफिनोने तिथे गेल्यानंतर एक छोटासा कंस्ट्रक्शन बिझनेस उभा केला. आज पावलो माईनो त्यांच्या ऍलेसँड्रा आणि नाडिया या दोन मुलींसोबत ऑरबेसेनो मध्ये राहतात. माईनो परिवार हा पारंपरिक रोमन कॅथलिक ख्रिश्चन परिवार होता आणि त्यांची आर्थिक परिस्थिती गरीब होती, त्यामुळे ऍन्टोनियाचे प्राथमिक शिक्षण स्थानिक कॅथलिक स्कुलमध्ये झाले. तिथल्या सोनियाच्या शिक्षिका, सिस्टर मरीना, सोनिया गांधींबद्दल बोलताना सांगतात की “अँटोनिया अशी मेहनती मुलगी होती, जी आवश्यक तितकाच अभ्यास करत असे.” ऍन्टोनियाने तिच्या वयाच्या १३ व्या वर्षी शालेय शिक्षण पूर्ण केले तेव्हाच्या प्रगतिपुस्तकावरील शेऱ्याप्रमाणे “(अँटोनिया) हुशार, मेहनती, एकनिष्ठ मुलगी असून हाय स्कुलमध्येही यशस्वी होईल.” फ्लाईट अटेंडंट होण्याची अँटोनियाची इच्छा माईनो परिवाराच्या आर्थिक परिस्थितीमुळे पूर्ण होऊ शकली नाही. 1964 मध्ये ती केंब्रिज शहरात बेल एजुकेशनल ट्रस्टच्या भाषा शाळेत इंग्रजी शिकण्यासाठी गेली. पुढच्या वर्षी ती वर्सीटी रेस्टॉरंटमध्ये पार्टटाईम वेट्रेस म्हणून काम करु लागली. इथेच तिची राजीव गांधींशी भेट झाली, त्यावेळी राजीवजी केंब्रिज विद्यापीठातील ट्रिनिटी कॉलेजमध्ये इंजिनियरिंग करण्यासाठी गेले होते. याबाबत बोलताना लंडनचे वृत्तपत्र टाइम्स सांगते की, “श्रीमती गांधी 1965 साली केंब्रिजमधील एका लहान कॉलेजमध्ये भाषेच्या विद्यार्थीनी होत्या, त्यावेळी त्यांचं वय १८ वर्षे होते; जेव्हा त्यांना राजीव नावाचा एक सुंदर तरुण अभियांत्रिकी विद्यार्थी भेटला.”
सोनिया गांधी यांचा इतिहास माहिती जीवन परिचय मराठी
वर्सीटी रेस्टोरंटमुळे सुरु झालेली मैत्री लवकरच प्रेमात बदलली आणि ३ वर्षांच्या प्रेमसंबंधांनंतर 1968 मध्ये दोघांनी हिंदू पद्धतीने विवाह झाला. हिंदू पद्धतीप्रमाणे अँटोनियाचे नाव बदलून ‘सोनिया’ झाले. तिने धर्मांतरही केले. त्यानंतर तिने आपल्या सासू आणि भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या घरी प्रवेश केला.
या दांपत्याने ‘राहुल’ आणि ‘प्रियंका’ अशा दोन मुलांना जन्म दिला. नेहरू-गांधी या भारतातील सर्वाधिक समर्थ राजकीय घराण्यातून असूनही सोनिया आणि राजीव यांनी सुरुवातीला राजकारणात रस दाखवला नाही. राजीव गांधी त्यावेळी एअर इंडियामध्ये पायलट म्हणून काम करत होते, तर सोनिया एखाद्या भारतीय सुनेप्रमाणेच तिच्या कुटुंबाची काळजी घेत होती. याकाळात सोनियाने आपल्या सासूबाई, इंदिराजींसोबत बराच वेळ घालवला; या बाबत बोलताना 1985 साली हिंदी भाषेच्या धर्मयुग मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सोनियाजी म्हणतात, “त्यांनी [इंदिराजींनी] माझ्यावर नेहमीच प्रेमाचा आणि मायेचा वर्षाव केला”. भारतात आणीबाणीच्या काळात 1977 मध्ये पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच गांधी कुटुंबाने काही काळ परदेशात जाण्याचा विचार केला.
23 जून 1980 रोजी विमान अपघातात आपला लहान भाऊ, संजय गांधी यांचा मृत्यू झाल्यानंतर राजीवने 1982 मध्ये राजकारणात प्रवेश केला तेव्हाही सोनियाने त्यांच्या कुटुंबावर लक्ष केंद्रित केले होते. अद्याप सोनीयाजींनी भारतीय समाजात सार्वजनिकरित्या सहभाग घेण्यात रस दाखवला नव्हता.
31 ऑक्टोबर 1984 रोजी इंदिराजींची हत्या झाली आणि त्यांचे वारसदार म्हणून राजीवजी भारताचे पंतप्रधान झाले आणि सोनियाजींच्या भारतीय समाजातील सार्वजनिक सहभागाला सुरुवात झाली. आपल्या राजकीय पाहुण्यांचे स्वागत करण्याची जवाबदारी पंतप्रधानांच्या पत्नी म्हणून सोनियाजींवर आली, तसेच राजीवजींनी पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर देशभर केलेल्या दौऱ्यांमध्ये सोनियाजी त्यांच्यासोबत जाऊ लागल्या. 1884 साली लोकसभा निवडणुकीसाठी अमेठी मतदारसंघातून आपले पती राजीवजी यांच्या विरोधात उभी राहिलेली त्यांची वहिनी, मनेका गांधी यांच्या विरोधात सोनियाजींनी जोरदार प्रचार केला.
राजीव गांधी यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळाच्या शेवटी बोफोर्स घोटाळा उघडकीस आला. या घोटाळ्यात आरोपी असलेल्या ओटावियो क्वाट्रोची या इटालियन व्यावसायिकाशी सोनिया गांधी यांचे मैत्रीसंबंध होते आणि त्यामुळेच ते पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानात प्रवेश करु शकत होते असे म्हटले जाते.
भारताचे नागरिकत्व स्वीकारण्याआधीच एप्रिल 1983 साली सोनिया गांधींचे नाव दिल्लीतील मतदार यादीत होते आणि हे घटनेविरुद्ध आहे असा आरोप भाजपने केला होता. माजी वरिष्ठ काँग्रेस नेते आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सांगितल्याप्रमाणे सोनियाजींनी 27 एप्रिल,1983 रोजीच आपला इटालियन पासपोर्ट इटालियन दूतावासाकडे सुपूर्द केला होता इटालियन राष्ट्रीयत्व कायद्याने 1992 पर्यंत दुहेरी राष्ट्रीयत्वाला परवानगी दिली नव्हती, म्हणजेच 1983 मध्येच भारतीय नागरिकत्व मिळवून सोनियाजींनी इटालियन नागरिकत्त्वाचा त्याग केला होता.
21 मे 1991 रोजी, सोनियाजींचे पती, माजी भारतीय पंतप्रधान मा.श्री. राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर सोनियाजींनी त्यांचे वारसदार म्हणून आपलं नाव लावण्यास नकार दिला आणि पक्षाची धुरा (आणि पुढे पंतप्रधानपद) पी. व्ही. नरसिंह राव यांच्याकडे आली. त्यानंतर काँग्रेस पक्षाचा एकछत्री अंमल डळमळायला सुरुवात झाली आणि पुढे १९९६ मध्ये काँग्रेसचा पराभव झाला. या पराभवाची परिणीती म्हणून माधवराव सिंधिया, राजेश पायलट, नारायण दत्त तिवारी, अर्जुन सिंह, ममता बॅनर्जी, जी के मूपनार, पी. चिदंबरम आणि जयंती नटराजन यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांनी तत्कालीन पक्षाध्यक्ष सीताराम केसरी यांच्या विरोधात खुला विद्रोह पुकारल आणि त्यापैकी बहुतेक नेते कॉंग्रेसचे विभाजन करून पक्षातून बाहेर पडले. यामुळे काँग्रेस पक्ष अनेक गटांमध्ये विभागला गेला. पक्षाच्या या डळमळीत स्थितीला सावरण्यासाठी सोनियाजींनी 1997 सालच्या पक्षाच्या कलकत्ता पूर्णवेळ अधिवेशनात प्राथमिक सदस्या म्हणून पक्षात प्रवेश केला. प्राथमिक सदस्यत्त्वाला 62 दिवस पूर्ण व्हायच्या आत सोनियांना पक्षाचे अध्यक्षपद देण्यात आले जे त्यांनी स्वीकारले.
1999 मध्ये त्यांनी कर्नाटकातील बेल्लारी आणि उत्तर प्रदेशमधील अमेठी अशा दोन लोकसभा मतदारसंघातून निवडणुका लढविल्या होत्या. त्यांनी दोन्ही जागा जिंकल्या परंतु अमेठीचे प्रतिनिधित्व करण्यास निवडले. बेल्लारीमध्ये त्यांनी अनुभवी भाजपा नेते सुषमा स्वराज यांना पराभूत केले होते.
मे 1999 मध्ये पक्षाच्या तीन वरिष्ठ नेत्यांनी ( मा. शरद पवार, पी. ए. संगमा आणि तारिक अन्वर) सोनियाजींचा भारताचे पंतप्रधान बनण्याचा प्रयत्न करण्याचा हक्क त्यांच्या परदेशी मुळांमुळे नाकारला. उलटपक्षी, त्यांनी पक्षाच्या नेत्या म्हणून राजीनामा देण्याची तयारी दाखवली याचा परिणाम म्हणून ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी’ बनविणार्या तीन विद्रोही नेत्यांच्या पक्षातूनच सोनियाजींना समर्थन आणि बहिष्कार निर्माण झाला.
1999 मध्ये 13 व्या लोकसभेच्या विरोधी पक्षनेते म्हणून सोनिया गांधींची निवड झाली.
भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केली तेव्हा सोनियाजींनी विरोधी पक्षनेते पदाचा पदभार स्वीकारला. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी 2003 मध्ये वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारवर अविश्वास प्रस्ताव ठेवला.
2004 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपच्या ‘इंडिया शायनिंग’ या घोषणेला सोनिया गांधींनी प्रतिप्रश्न केला, “भारत कोणासाठी चमकत आहे?” याच बरोबर त्यांनी देशव्यापी घोषणा केली, “आम आदमी” निवडणुकीत, रायबरेलीतील जवळच्या प्रतिस्पर्ध्यावर 200,000 मतांच्या फरकाने सोनिया गांधी पुन्हा निवडून आल्या. एनडीएच्या अनपेक्षित पराभवानंतर, आता सोनियाजी भारताच्या पुढील पंतप्रधान असतील असे अंदाज केले जात होते.
16 मे 2004 रोजी, डाव्या पक्षांच्या पाठिंब्याने 15 पक्षीय गठबंधन (आघाडी) सरकारचे नेतृत्व करण्यासाठी त्यांची सर्वसमावेशक निवड झाली, ज्याचे नाव नंतर युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स (यूपीए) अर्थात संयुक्त प्रगतिशील गठबंधन असे ठेवले गेले.
पराभूत झालेल्या एनडीएने पुन्हा एकदा ‘विदेशी मूळांवर’ आरोप केले आणि वरिष्ठ राजकारणी सुषमा स्वराज आणि उमा भरती यांनी सोनिया पंतप्रधान झाल्यास आम्ही मुंडन करू आणि जमिनीवरच झोपू असा इशारा दिला.
भारतीय नागरिकत्व कायदा,1955 च्या कलम 5 अन्वये विरोधकांनी सोनियाजींवर आरोप केले, जे इतरांद्वारे लढवले गेले आणि अखेरीस सर्वोच्च न्यायालयाने हा खटला फेटाळुन लावला.
सोनियाजींनी पंतप्रधान बनण्यात आपल्याला रस नसल्याचे सांगितले, याला काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या विरोधाला न जुमानता त्या आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. युपीएचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर दोनच दिवसांनी 18 मे रोजी सोनियाजींनी माजी अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांना पंतप्रधानपदाची उमेदवारी देण्याची इच्छा व्यक्त केली आणि इतर नेत्यांनी त्यावर आपली सहमती दर्शवली. या निर्णयाचे सोनियाजींच्या समर्थकांनी ‘त्यागाची पुरातन भारतीय परंपरा’ म्हणून कौतुक केले, तर विरोधकांनी त्याला ‘राजकीय स्टंट’ म्हणून त्यावर टीका केली.
राष्ट्रीय सल्लागार समितीच्या अध्यक्षस्थानी सोनियाजींची नियुक्ती झाली पण त्यांनी या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप विरोधकांनी केला. यामुळे सोनियाजींनी 23 मार्च 2006 रोजी आपल्या राष्ट्रीय सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
मे 2006 मध्ये त्या पुन्हा एकदा रायबरेली मतदारसंघामधून 400,000 मतांनी जिंकून आल्या.
राष्ट्रीय सल्लागार समितीच्या आणि युपीएच्या अध्यक्षा म्हणून राष्ट्रीय रोजगार हमी योजना आणि माहितीचा अधिकार या योजना प्रत्यक्षात आणण्यात सोनियाजींचा मोठा वाटा आहे.
2006 साली ब्रुसेल्स युनिव्हर्सिटीने सोनियजींना मानद डॉक्टरेट प्रदान केली आणि बेल्जीयम शासनाने ‘ऑर्डर ऑफ किंग लिओपोल्ड’ बहाल केली.
2 ऑक्टोबर 2007 रोजी संयुक्त राष्ट्रसंघामध्ये सोनियाजींनी महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने संयुक्त राष्ट्रसंघाला संबोधित केले. त्याचवर्षी फोर्ब्ज मासिकाने जाहीर केलेल्या यादीनुसार जगातील तिसऱ्या सर्वात प्रबळ व्यक्ती असे त्यांना म्हटले होते आणि त्यांना विशेष यादीत 6 वे स्थान देण्यात आले होते.
2007 आणि 2008 साठी ‘टाइम्स’ द्वारे जाहीर करण्यात आलेल्या ‘जगातील 100 सर्वात प्रभावी व्यक्तिमत्त्वां’मध्ये सोनियाजींनी स्थान पटकावलं होतं.
2008 साली मद्रास विश्वविद्यापीठाने लिटरेचर विषयात मानद डॉक्टरेट प्रदान केली.
2009 च्या सार्वत्रिक निवडणुकीत सोनियाजींच्या नेतृत्वाखाली यूपीएने निर्णायक बहुमत जिंकले. काँग्रेसने 206 लोकसभेची जागा जिंकल्या होत्या, जी 1991 नंतर कोणत्याही पक्षाने सर्वाधिक जिंकलेली संख्या होती. रायबरेलीचे प्रतिनिधी म्हणून संसदेचे सदस्य म्हणून तिसऱ्यांदा सोनियाजी पुन्हा निवडून आल्या आणि मनमोहनसिंग पंतप्रधान म्हणून पुन्हा एकदा निवडून आले.
2010 मध्ये सोनिया गांधींनी फोर्ब्स मासिकाने जाहीर केलेल्या यादीत ‘ग्रहावरील नवव्या सर्वात शक्तिशाली व्यक्ती’ म्हणून स्थान मिळविले.
2012 मध्ये फोर्ब्सने जरी केलेल्या शक्तिशाली लोकांच्या यादीमध्ये त्या 12 व्या स्थानी होत्या.
2010 साली न्यू स्टेट्समॅन मासिकाने जाहीर केलेल्या ‘जगातील 50 प्रबळ व्यक्तिमत्त्वांच्या’ यादीत सोनिया 29व्या स्थानी होत्या.
ऑगस्ट 2011 मध्ये न्यूयॉर्कमधील मेमोरियल स्लॉन-केटरिंग कॅन्सर सेंटरमध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे सोनियाजींवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. उपचारानंतर 9 सप्टेंबर रोजी त्या भारतात परतल्या. हा मुद्दा घेऊन पुढे 18 जुलै 2012 ला त्यांच्या राजकीय वारासदाराबद्दल एका मुलाखतीत सोनियाजींना प्रश्न विचारण्यात आला असता “
पक्षात आणि राजकारणात यायचं कि नाही हा निर्णय राहुल स्वतः घेईल” असं उत्तर सोनियाजींनी दिलं.
2013 साली सोनियाजी काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद सलग 15 वर्षे भूषविणार्या पहिल्या अध्यक्षा ठरल्या. याचवर्षी सोनियाजींनी भारतीय दंडविधान कलम 377 ला समर्थन दर्शवणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर नापसंती दर्शवली आणि LGBT समूहाच्या हक्कांना पाठिंबा दिला.
अशा प्रकारे 2004-2014 या दहा वर्षांच्या काळात सोनिया गांधी या भारतातील सर्वाधिक प्रभावशाली राजकारणी आणि सर्वात समर्थ महिला होत्या आणि जगभरातल्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या जगभरातल्या वेगवेगळ्या मासिकांनी जारी केलेल्या यादींमध्ये सोनियाजींनी स्थान पटकावले होते.
2014 च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत दाखल केलेल्या शपथविधीनुसार, सोनिया यांनी 98.8 दशलक्ष रुपयांची मालमत्ता, 28.1 दशलक्ष जंगम मालमत्ता आणि 64.7 दशलक्ष स्थावर मालमत्ता इतकी मालमत्ता जाहीर केली होती. शेवटच्या (2009 च्या) निवडणुकीत घोषित केलेल्या मालमत्तेपेक्षा ही संख्या सहापट आहे.
2014 च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेस पक्षाच्या वेगवेगळ्या नेत्यांनी केलेले घोटाळे उघडकीस आले आणि काँग्रेसविरुद्ध आणि सोनियाजींविरुद्ध असंतोषाची लाट आली. हे वातावरण भाजपने स्वतःच्या प्रचारासाठी पुरेपूर वापरून घेतले आणि या लाटेत काँग्रेसचा ऐतिहासिक पराभव झाला.
रायबरेली मतदारसंघातून सोनियाजी निवडून आल्या असल्या तरीही त्यांचा करिष्मा ओसरला होता.
सोनियाजींनी राजीनामा द्यावा आणि राहुल गांधी यांना काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नेमण्यात यावे असा प्रस्ताव जेव्हा चर्चेत आला तेव्हा कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी नोव्हेंबर 2017 मध्ये दिलेल्या मुलाखतीत सोनिया गांधी यांच्याबद्दल असे गौरवोद्गार काढले, ” सोनिया हा असा ग्लू होता जो विरोधी पक्षांना बांधून ठेवत असे. राहुल गांधी हा करिष्मा करू शकणार नाहीत” तरीही राहुल यांची 16 डिसेंबर 2017 रोजी 49 व्या काँग्रेसच्या अध्यक्षपदी एकमुखाने निवड झाली.
२०१६ पासून राजकीय प्रचारापासून वेगळ्या राहत असल्या तरीही सोनियाजींनी मे 2018 ला झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी विजापूर येथे घेतलेल्या सभेत भाषण करून पक्षाला गरज असेल तर आपण अजूनही कार्यरत आहोत हे दाखवून दिले आहे. येणाऱ्या गोष्टी काळच ठरवेल पण असे असले तरीही सोनियाजींचे भारतीय राजकारणातील स्थान कोणीही पुसून काढू शकत नाही हे सुनिश्चित!
सोनियाजींचा संघर्ष हा फक्त राजकीय नसून, त्यांना भारतीय न ठरवणे, त्यांच्या देशभक्तीवर आक्षेप घेणे आणि त्याच बरोबर इंटरनेट या माध्यमांद्वारे त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे काम विरोधकांनी केले आहेच पण त्या डगमगल्या नाहीत. त्या संघर्ष करत राहिल्या देशासाठी! त्यांच्या या देशसेवेसाठी सलाम!
-कॉलेज कट्टा रिसर्च टीम.
मित्रांनो, सोनिया गांधी यांचा इतिहास माहिती जीवन परिचय मराठी Sonia Gandhi Information Biography History in Marathi Language
ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला खालील कॉमेंट बॉक्स मध्ये प्रतिक्रिया देऊन आवश्य कळवा आणि आपल्या आवडत्या कॉलेज कट्टा या संकेतस्थळाला पुन्हा आवश्य भेट द्या.
कॉलेज कट्टा म्हणजे माहितीचे व्यासपीठ! जिथे दैनंदिन जीवनात उपयोगाला येणारी महत्वपूर्ण माहिती सोप्या भाषेत सादर केली जाते.
राजीव गांधी यांच्याबद्दल माहिती
https://www.britannica.com/biography/Sonia-Gandhi
सोनिया गांधी माधवराव सिंधिया
Leave a Reply