माणसाच्या जीवनाची उत्क्रांती व विकास
जीवनाची निर्मिती हा काही दैवी चमत्कार नाही.विशिष्ट भौतिक परिस्थितीतून निसर्गनियमानुसार जीवनाची निर्मिती झाली आणि अशीच परिस्थिती जेथे असेल तेथे जिवसृष्टी निर्माण होणे शक्य असते . सुरुवातीच्या काळातील माणूस निसर्गाच्या होणाऱ्या हालचाली आश्चर्यकारक पणे पाहत होता आणि तेंव्हापासून तो ढगांचा गर्जनार आवाज, अंगावर शहारे आणणारा विजांचा कडकडाट चमचमाट , मुसळधार पाऊस, जंगलात लागणारे वणवे सुरवातीच्या काळातील मानवाच्या समजण्यापलीकडचे होते. या निसर्गातील शक्तींना पंचमहाभूते किंवा महादेवता म्हटले जायचे. उत्क्रांतीमध्ये माणूस सगळ्यात अलीकडे सर्वात दुबळा प्राणी होता असे समजायला काहीच हरकत नाही, कारण माश्यासारखा तो कायम पाण्यात राहू शकत नाही.पक्षाप्रमाणे त्याला हवेत उडता येत नव्हते. आणि हरणाचे पाय माणसाच्या पायापेक्षा अधिक भक्कम आहेत, त्यामुळे मानवाला हरणासारखे वेगात धावणेही शक्य नाही. हत्ती, घोडा,यांना माणसापेक्षा अधिक ताकद दिलेली आहे. बर्फाळ प्रदेशात राहणाऱ्या अस्वलाला त्याच्या अंगावरील दाट केस त्याच्या संरक्षणासाठी दिले आहेत. मांजर हे अंधारात पाहू शकते.पण माणूस नाही पाहू शकत. आपण ज्यांना आपले पूर्वज मानतो असे माकडच घ्या ना ते माकड झाडाच्या या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारू शकते तसे माणसाला नाही करता येत.जन्माला आलेले गाईचे वासरू एका दिवसात पाय झाडत उभा राहते. परन्तु माणसाच्या पोटी जन्म घेणाऱ्या बाळाला मान धरण्यासाठी किमान 3 महिने लागतात. हे असे असूनही आज माणूस जगाचा स्वामी बनला आहे. हे कशाच्या जोरावर शक्य झाले असेल तर ते फक्त बुद्धी, विचार करण्याची क्षमता आणि ज्ञानाच्या जोरावर! सर्व प्राण्यांत फक्त मनुष्यप्राण्याच्या हाताला बाकीच्या बोटावर टेकवत येईल असा अंगठा मिळाला.माणसाने प्रथमतः दहा बोटांचे अवजार करून त्याने निसर्गावर प्रक्रिया करण्याला सुरुवात केली. नंतर दगडाच्या अवजारांचा शोध लाऊन त्याचा वापर करण्यास सुरुवात केली. पुढच्या टप्प्यावर दगडाला धार लावली त्याला झाडाची फांदी जोडून कुर्हाड तयार केली. मग काही वरश्यांनी धातूचा शोध माणसाने लावला. धातूच्या आधारे हत्यारे आणि अवजारे बनवली जाऊ लागली. या सर्व अवजारांचा सहाय्याने आजूबाजूच्या निसर्गावर प्रक्रिया करतच माणसाच्या मेंदूचा विकास होत गेला. नंतर माणसाला त्याच्याकडे असणाऱ्या आवाजाची जाणीव होऊन त्याने एक प्रकारची आपली भाषा सुरु केली. प्राणी असलेल्या माणसाकडे ज्ञान आणि भाषा यांच्या आधाराने आपला विकास घडवुन आणला… तो विकास करत गेला. माणसाची सरासरी विचार करण्याची शक्ती म्हणजे विवेकबुद्धी असे समजले जाते. ही विवेकबुद्धी दोन क्षेत्रात काम करते, ती म्हणजे ज्ञानाच्या क्षेत्रात आणि आचरणाचे क्षेत्रात ज्ञानाच्या क्षेत्रात योग्य काय? अयोग्य काय? याचा निर्णय वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे विवेकबुद्धी करते. आचरणाचे क्षेत्रात विवेकी आचरणाचा निकष म्हणजे ते आत्मकेंद्री नसते. आपल्या विचारांबरोबरच इतरांच्या भावनांचाही त्यात विचार केला जातो. लहान असतानाची काही वर्षे मुलांमध्ये आत्मकेंद्रीपण जास्त दिसून येतो. काही काळानंतर त्याचा समाजाशी जसजसा संबध वाढत जातो तसा त्याचा आत्मकेंद्रीपणा नष्ट होण्यास सुरुवात होऊन समाजीकतेशी त्याची नाळ जोडली जाऊ लागते. माणसाच्या वागणुकीमागे तो उपभोग, कीर्ती, अंधश्रद्धा अशा एक ना अनेक प्रेरणा असतात. विवेकी बुद्धीची प्रेरणाही त्यामागे असते.
-सागर गोरखे.
Leave a Reply