केसावर फुगे…
घरात कुणी राहत नसलं तर घराचा हळूहळू उकीरडा होतो. त्या घराची एक एक विट गायब व्हायला लागते.अरे उकीरडे झालेले जुने घरं गावात प्रत्येक गल्लीत एक तरी असतच.गल्लीतला सगळा कचरा पाहटच्या अंधारात बायका गुपचूप आणून टाकत असतात आणि कचरा टाकणाराच्या नावाचा उद्धार देवाच्या नावाच्या आधी होत असतो.हे उकीरडे आईबाप नसलेल्या पोरासारखे पोसले जातात गावाकडं.शहरात नगरपालिका असते बाप म्हणून.
गावाकडचे उकीरडे धुडांळणं हे काम शाळा सुटल्यावर पोरं करायची.त्यामुळे “कुठं गेलता उकीरडे फुंकायला” हे वाक्य आज ऐकल्यावर अपमान झाल्यासारखा वाटत नाही. अहो खरच उकीरडे धुंडाळत हिंडायचो आम्ही. ऐकताना घाण वाटत असेल पण तेव्हा उकीरडे आजच्याइतके घाणेरडे नव्हतेच.आता चांगला काय किंवा वाईट काय उकीरडा तो उकीरडाच नाही का…?
काय काय नसायचं त्यात.जुन्या, वापरात नसलेल्या इलेक्ट्रॉनिकच्या,लोखंडाच्या कितीतरी वस्तू आणि केसं.
हो केसच.आता याचा वापर काय…?
तर गोष्ट अशी आहे.तेव्हा मी दुसरीत असेल.गावात फुगे विकणारा दर शनिवारी यायचा.बाजार असायचा त्या दिवशी. फुग्यासोबत गारेगार,बुढ्ढीकेबाल आणि काय काय मिळायचं.
“हे भंगार लवा लोखांड,भंगारवालैय” असं सुरात ओरडत तो गावात फिरायचा.”सुया,पिना,फुगे घ्या फक्त केस्सावर” असं ओरडला की बायका दारात येऊन उभा रहायचा.तो एकदा थांबला की मग एक दिड तास बायका त्याला सुदरु देत नव्हत्या.खरेदी झाल्यावर बायका त्याला पैसे देत नसत ,केसं द्यायच्या.हे गणित सुरुवातीला कळलच नाही. हा माणूस केसं का घेत असलं…? त्याचं तो काय करत असेल…? हे सगळं कळण्यापलिकडे असलं तरी एक कळलं होतं.केसावर ह्यो माणूस काहीही देतो…।
बुढ्ढीकेबाल खायला मला खूप आवडायचं.ती कशी तयार होत असल हे कोडच होतं.ती खाण्यासाठी पैसे काही मिळायचे नाहीत. मग एक शक्कल आम्ही पोरांनी शोधून काढली.केसं जमा करुन ठेवायची आणि शनिवारी ते फुग्यावाल्याला द्यायचे.केसं मिळण्याचं एकमेव ठिकाण “उकीरडा”…
सकाळची शाळा सुटली की अख्खा दिवस उनाडक्या करण्यात जात असे.घरी कुणी नसायचं.आई शेतात जायची तेव्हा दुपारची भाकर बांधून ती अंगणात बांधून ठेवायची आणि घराला कुलूप लावून जायची.वडिल तालुक्याला जायचे कामाला.घरी मी आणि भाऊ.शाळा सुटली,दप्तर फेकलं की आम्ही जेवणं करुन मोहीमेवर निघायचो.खिशात एक प्लास्टिक पिशवी असायची.केसाचे वेगवेगळे प्रकार सापडायचे.जाड तरुण केसं,पातळ पांढरे म्हातारीचे केसं…गोळे गोळे करुन फेकलेले असायचे.केसं फारसे सापडायचे नाहीत. या बायका रोज केस विंचरतात मग केसं जातात कुठं…? बालमनाला पडलेला पहिला उत्स्फूर्त प्रश्न…केसं नाही तर नाही पण दारुच्या बाटल्या,लोखंडी डबे,तारा,पत्रा असं बरच काही काही सापडायचं ते जमा करुन ठेवायचोत…
एक दिवस असच आई घरी होती.दुपार ढळली चार पाच वाजले की बायका कुणाच्या ना कुणाच्या घरी जमून गप्पा मारत बसायच्या.मी आई बरोबर गेलो होतो गल्लीतच एका घरी.लहाणपणी दुसऱ्याच्या घरी जायला फार आवडायचं.बायकांच्या गप्पा सुरू झाल्या.मी बाजूलाच लोळत पडलेलो…लघवी आली म्हणून मोरीत गेलो.गावात आंघोळीसाठी आणि लघवीसाठी वेगवेगळी सोय तेव्हा नव्हती.लघवी करताना लक्षात आलं भिंतीच्या सांदीमध्ये केसं खूपसून ठेवलेली होती.तेव्हा डोक्यात लख्ख प्रकाश पडला…आधी घरी जावून घरची मोरी हुडकली तवां पिशवीभर केसं सापडली…
रात्री पोरं पोरं जमलो तव्हा विषय निघला,”यार या बायका केसं लपवून ठेवतात मोरीत म्हणून उकीरड्यावर सापडत नाहीत…”
“आमची आय पण ठिवती पिशवीत घालून”
“पण ते आणयचे कसे”
तेव्हा ठरलं उकीरडे बंद…
लोकांच्या घरचे बाथरूम धुंडाळायला सुरुवात केली.गावात बहुतेक सगळ्याच लोकांची आंघोळीसाठीची जागा अंगात असते.दुपारी गल्ल्या सामसूम असत्यात.मोहीमा सुरु. आता रोज रोज केसं मिळणार नाहीत म्हणून दर दोन-तीन दिवसाला एक चक्कर असं पोरांनी ठरवलं…दिवस एकदम मजेत,शनिवारची वाट पाहण्यात जावू लागले.एके शनिवारी फुग्यावाला आला तेव्हा बायकांच्या गप्पा सुरू झाल्या.कुजबुज सुरु झाली. केसं चोरुन विकणारी टोळी आली वैगरे. जाम हसायला आलं टोळी वैगरे काय…ही मोठी माणसं पण वेडीच असतात असं बुढ्ढीकेबाल खातखात आम्ही बोलत होतो.केस विकतात म्हणे…काहीतरीच…।
बायका सावध झाल्या होत्या.म्हणून आम्हाला आता केसं मिळणं जवळ जवळ बंदच झालं होतं.पण दर शनिवारी तो माणूस यायचा तेव्हा मात्र कसंतरी वाटायचं.पैसे तर नसायचे मग कमावले पाहिजे.
वय वाढत गेलं तसे छंदही बदलत गेले.प्रत्येक गोष्टींच एक वय असतं.त्यात बालपण हे कुठल्याही लाँजिकशिवाय जगण्याचं वय.त्या जगण्याला शास्त्र नसतं.गावात संस्कार मातीत खेळूनच होतात.
नंतर पुढे गावात चढाओढीनं घरं बांधायला सुरुवात झाली तेव्हा ते उकीरडे नाहीसे होत गेले आणि त्या जागी दुमजली घरं उभी राहीली. त्या घरात राहणाऱ्या लोकांसाठी ते घर पण आमच्यासाठी उकीरडाच…
ही गोष्ट जराशी विचीत्र आहे पण खरी आहे.आमच्या पैकी एकाला उकीरडे धुंडाळताना एक सेल आणि बँटरीचा गट्टू सापडला.बरेच दिवस तो त्याच्याबरोबर खेळत होता.आजही खेळतोय इलेक्ट्रॉनिकचं मोठं दुकान त्याचच आहे गावात.उकीरड्यावर आंब्याच्या कोया फेकलेल्या असायच्या त्याची रोपं व्हायची.ती रोपं जमा करण्याचा छंद एकाला लागला.पुढे त्याचा अनेकवेळा सत्कार केला शाळेत झाडं लावल्याबद्दल… यात माझ्याकडे शिल्लक राहिल्या त्या फक्त आठवणी.काय मिळालं माहीत नाही.
सगळ्या गोष्टी संपल्या म्हणून जेव्हा त्या उकीरड्यावर येतात तेव्हाच त्यातून नवीन गोष्ट घडताना मी पाहीली.पालेभाज्यांचं खत,बियांची झाडं…
कोणाला कुठे काय गवसल नाही सांगता येत…
कारण आपण ज्याला कचरा म्हणतो त्यात कुणालातरी पोट भरण्याचं साधन दिसतं.परिस्थिती दृष्टी देते पण दृष्टिकोन मात्र आपलाच हवा…
-संतोष गायकवाड
-कॉलेज कट्टा
Leave a Reply